Get it on Google Play
Download on the App Store

मे १८ - साधन

माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही . तो मदत करतो किंवा आड येतो , या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये . माझी वृत्ती कुठे गुंतते हे पहावे . भगवदभजनात दिवस घालवावा असे वाटू लागले , पण संगत मिळाली खेळ खेळणार्‍याची . तेव्हा , त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला , भगवंताच्या स्मरणात राहाण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला , तर कसे होणार ? आईने आजवर खस्ता खाल्ल्या , लहानाचे मोठे केले , तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्‍यासारखी वाटू लागली ! वास्तविक , दोघांच्याही देहांत फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही ; पण वृत्तीत बदल झाला . विषयातच मी गुंतून राहू लागलो , याला काय करावे ?

‘ मी सुख कशाने होईन ’ हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले ; पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दु : ख असे काही आहे का ? जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही , त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो . दुसरा मनुष्य ज्या वेळी आपल्याला त्रास देतो , त्या वेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते . बाकी उरले पन्नास टक्के ; त्याबद्दल ‘ त्याने दिलेला त्रास मी करुन घेणार नाही ’ ही वृत्ती असावी , म्हणजे संपले ! आपली वृत्ती सारखी बदलते आहे , आणि जगही सारखे बदलते आहे . त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दु : ख होते हे वाटणे खरे नव्हे , कारण सुखदु : ख अस्थिर असते . शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात . भजन , पोथीवाचन , मंदिर बांधणे , वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते , त्यापासून खरा फायदा होत नाही . आगगाडी रोज कशीला जाते , पण तिला काही काशीयात्रा घडत नाही , यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना . गंगास्नान , विश्वेश्वराचे दर्शन , वगैरे आतल्या लोकांना घडते . त्याचप्रमाणे , देहाने नुसता पूजापाठ वगैरे करुन परमार्थ घडत नाही . आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे . भगवंताचे रुप सारखे समोर ठेवता येणार नाही , पण त्याचे रुप लक्षात आले नाही तर आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल . आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो . त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते . ती भगवंतालाच कळते , म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही . विषयाचा भोग आला असता तो त्यामध्येच गुंतत नाही , त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावे . भगवंतापासून वेगळे न राहाणे , त्याचे विस्मरण न होऊ देणे , त्याच्या स्मरणात राहाणे , त्याच्या नामात राहाणे , यांत खरे समाधान , शांती आणि सुख आहे .