Get it on Google Play
Download on the App Store

रामायण बालकांड - भाग ७

यानंतर गौतम-अहल्येची प्रसिध्द कथा पाहूं. जनकाच्या मिथिला नगरीत प्रवेश करण्यापूर्वी उपवनात एक उजाड आश्रम दिसला तेव्हां हा कोणाचा असे रामाने विचारले. त्यावर विश्वामित्राने हा आश्रम गौतमाचा असे म्हणून गौतम अहल्येची कथा रामाला सांगितली. ती आपल्या समजुतीपेक्षां बरीच वेगळी आहे. गौतम बाहेर गेलेले असताना, अहल्येची अभिलाषा धरून इंद्र गौतमवेषाने अहल्येकडे आला. हा गौतम नव्हे, इंद्र आहे हें अहल्येला कळले होते. मात्र तरीहि खुद्द देवराज इंद्र आपली अभिलाषा बाळगतो याचा आनंद व अभिमान वाटून अहल्या इंद्राला वश झाली. हेतु साध्य झाल्यावर मात्र गौतमाच्या भयाने इंद्र पळून जात असतानाच गौतम परत आले. झालेला प्रकार ओळखून त्यांनी इंद्राला रागाने घोर शाप दिला, ज्यायोगे त्याचे वृषण गळून पडले. अहल्येची त्यांनी निर्भर्त्सना केली पण शाप दिला नाही! ती शिळा होऊन पडली नाही. ’आपला संसार संपला, मी निघून जातो आहे. झाल्या गोष्टीचा पश्चात्ताप करीत दीर्घ काळपर्यंत तूं येथेच रहा. कालांतराने तुझ्या दुराचरणाचा दोष तुझ्याच तपाचरणाने पुसून जाईल. पुढे राम येथे येईल ती त्याची कालमर्यादा राहील. त्यांनंतर मी पुन्हा तुझा स्वीकार करीन’ असे म्हणून गौतम निघून गेले. गौतमाचे सांगणे मानून अहल्या तेथेच तपाचरण करीत राहिली. ही सर्व कथा सांगून विश्वामित्राने रामाला म्हटले कीं ’अहल्या येथेच आहे तेव्हां तिची भेट घे’. तिचा उद्धार कर वगैरे काही मुळीच सांगितले नाही!
राम लक्ष्मण व विश्वामित्र आश्रमात जाऊन अहल्येला भेटले. रामाने अहल्येला पाहिलें तेव्हां ती दीर्घ तपाचरणामुळे दैदीप्यमान अशी रामाला दिसली. तिने राम-लक्ष्मण व विश्वामित्र यांचा आदर सत्कार केला. राम-लक्ष्मणांनी तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. तेवढ्यांत गौतमहि येऊन त्यानीहि विश्वामित्राला वंदन केले व अहल्येचा स्वीकार केला. पुढे जनकाच्या नगरीत जनकाचा पुरोहित असलेला गौतम-अहल्यापुत्र शतानंद याने रामाकडून हीसर्व हकीगत समजावून घेऊन मातापित्यांचा समेट झाल्याचे ऐकून समाधान व आनंद व्यक्त केला.
ही कथा जशी रामायणात आहे तशीच, नैसर्गिक, उज्ज्वल व रोचक वाटते. तिचें, अहल्या शापामुळे दीर्घकाळ शिळा होऊन पडणे, रामाच्या पायधुळीमुळे ती पुन्हा मानवरूपात येणे, असे खुळचट स्वरूप कां व केव्हां बनले असावे? रामाला ईश्वरावतार मानले जाऊ लागल्यावर निव्वळ रामाला मोठेपणा देण्यासाठी झाला असावा. इंद्र भेटीपूर्वीचा शतानंदाचा जन्म, इंद्रभेटीपूर्वीच तो आश्रम सोडून गेलेला होता म्हणजे तेव्हां तो १५-२० वर्षांचा असावा. तो रामाला भेटला तेव्हा त्याचे वर्णन अतिवृद्ध असे केलेले नाही. त्या अर्थी फारतर २०-२५ वर्षे अहल्येने तपाचरणात व्यक्त केली. युगानुयुगे शिळा होऊन पडून राहून रामाची वाट पाहत नव्हे हे निश्चित! ’पाउलातली धूळ होउनी’ वगैरे सर्व खोटे! अहल्येची खरी कथा खुद्द वाल्मिकिरामायणात स्पष्ट लिहिलेली असूनहि आपण तिचे भ्रष्ट स्वरूप बिनदिक्कत स्वीकारतो याचे नवल वाटते.