Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५

पदरीं पडलें तें पवित्र मानून, इच्छा असो वा नसो, हे दोन्ही पुत्र मोठे होईपर्यंत भीष्माला राज्य संभाळावे लागले! धृतराष्ट्र आंधळा त्यामुळे राजा होण्यास लायक नव्हताच त्यामुळे पांडु पुरेसा मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून भीष्म मोकळा झाला. पांडूमध्ये कोणता जन्मदोष होता हे स्पष्ट नाही. तर्क करावयाचा तर बहुधा त्याच्या हृदयाला छिद्र वगैरे असावे त्यामुळे लहानपणी तो पांढराफटक असावा. बाल व तरुण वयात तो दोष काहीसा झाकला गेला असावा म्हणून त्याचा युद्धकलेचा अभ्यास झाला व तो वीरपुरुष बनला. पुढे वय वाढल्यावर तो दोष पुन्हा पुढे आला असावा व कोणताही ताण, राज्यकारभाराचा वा संसारसुखाचा, झेपणे त्याला शक्य राहिले नाही. त्यामुळे त्याला राज्यनिवृत्ति स्वीकारून वनवास व पुत्रासाठी कुरुकुळात पुन्हा एकदां नियोग स्वीकारावा लागला. पांडु वनात भार्यांसह गेला त्याला भीष्माने रोखले नाही. राजधानीतच राहून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घे असे सत्यवतीने वा भीष्माने त्याला म्हटले नाहीं. आधीच्या पिढीचा अनुभव लक्षात घेऊन ’तूं हिमालयाकडे जाऊन कुरुसमुदायांतील तिकडील एखाद्या योग्य पुरुषामार्फत नियोगमार्ग पत्कर’ असें भीष्मानेच त्याला सुचवले असा माझा तर्क आहे. (पांडवांचा जन्म देवांपासून हे एक रूपकच म्हटले पाहिजे. तें शब्दश: घेणे योग्य नाहीं )
पांडु राज्य सोडून वनांत गेल्यामुळे नाइलाजाने धृतराष्ट्राला राज्यावर बसवून कारभार भीष्म व विदुर यांना पहावा लागला. विवाह पांडूबरोबरच होऊनहि अद्याप धृतराष्ट्रालाहि अपत्यें झालीं नव्हतीं. कुंतीला वनात युधिष्ठिर पुत्र झाल्याचें गांधारीला कळले तेव्हां तीहि गरोदर होती असें महाभारत म्हणतें पण हे बरोबर वाटत नाहीं. तिचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिरापेक्षा लहान, भीमाच्याच वयाचा होता! कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती! कालांतराने पांडू व माद्री यांचा वनात मृत्यु झाला व कुंती पांच पुत्रांसह हस्तिनापुरास परत आली. कौरव पांडव दोघेंहि लहान असल्यामुळे राज्याची व्यवस्था कायम राहिली. मात्र दुर्योधनाला युधिष्ठिर हा आपला प्रतिस्पर्धी आहे हें लहानपणापासूनच स्पष्ट दिसूं लागलें.
कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था भीष्माने नीट लावली. आधी कृप व मग द्रोण यांचेपाशी ते युद्धकला उत्तम शिकले. सर्व राजपुत्र मोठे झाल्यावर अस्त्रदर्शनाचा प्रसंग घडला. त्यावेळी अचानक उपस्थित होऊन कर्णाने अर्जुनाची बरोबरी करून मग त्यांच्या द्वंद्वापर्यंत पाळी आली. ते थांबवण्याचे श्रेय कृप व भीमाला दिले पाहिजे. भीष्माने कुरुप्रमुख या नात्याने वेळीच हस्तक्षेप केला नाही. दुर्योधनाने आततायीपणे कर्णाला अंगराज्य देऊन टाकले व राज्याभिषेकहि केला. त्याला भीष्माने थांबवले नाही. कुलप्रमुख या नात्याने त्याच्या संमतीशिवाय हे कसे होऊ शकले? दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला! मात्र पुढे नवीनच पेंच उभा राहिला. राज्यावर धृतराष्ट्र पण यौवराज्य युधिष्ठिराला दिले. हा अर्थातच भीष्माचा निर्णय होता. यातून तिढाच निर्माण झाला. कौरव-पांडवांतील वाढता वैरभाव व दुर्योधनाला मिळालेली कर्णाची साथ हे दिसत असूनहि भीष्माने वेळीच राज्य वाटून देण्याचा उपाय योजला नाही. दुर्योधन सुखासुखी युधिष्ठिराला राज्य मिळू देणार नाही हे उघड होते व धृतराष्ट्र दुर्योधनाच्या आहारी जातो आहे हेहि दिसत होते तरीहि भीष्माने काही केले नाही. या वेळीं भीष्माचा सल्ला वा निर्णय धृतराष्ट्र वा दुर्योधन झिडकारूं शकले नसते. पण भीष्माने तसे केले नाही. अलिप्तपणा एवढेच कारण?