Get it on Google Play
Download on the App Store

जयद्रथवध - भाग ५

अर्जुनाचे व दुर्योधनाचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाचे बाण लागूनहि दुर्योधनाला इजा होत नाही हे पाहून कृष्ण चकित झाला. तुझ्या हातातील बळ संपले की काय असे त्याने अर्जुनाला खिजविले! द्रोणाने दुर्योधनाला बांधलेले मंत्रकवच ओळखून अर्जुन कृष्णाला म्हणाला की ही विद्या द्रोणाने मला एकट्यालाच शिकवली आहे व कवचाचा भंग करणेहि शिकवले आहे! त्याप्रमाणे कवचभंगासाठी त्याने केलेला अस्त्रप्रयोग मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच दुसरे अस्त्र सोडून निष्फळ केला. आतां त्याच अस्त्राचा पुन्हा प्रयोगहि करता येणार नव्हता! त्यामुळे निर्भय झालेल्या दुर्योधनाने जोरदार शरवृष्टि सुरू केली तेव्हा राग येऊन अर्जुनाने त्याचा रथ, सारथी, घोडे यांचा नाश केला व त्याच्या तळहातांवर व नखांवर बाण मारले. हे भाग कवचाने संरक्षित नसल्याने भयंकर इजा होऊन दुर्योधनाने पळ काढला! आकस्मिक आलेल्या अडचणीला अर्जुनाने कौशल्याने तोंड दिले. यानंतर अर्जुनाचीं सहा संरक्षक वीरांशी वारंवार युद्धे झाली.
द्रोणाशी सामना करताना युधिष्ठिराला कृष्णाच्या पांचजन्याचा सारखा आवाज येत होता पण अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा येईना त्यामुळे अर्जुनाच्या सुरक्षिततेची चिंता वाटून त्याने अखेर सात्यकीला ’माझे रक्षण मी कसेही करीन पण तू जा’ असे निक्षून सांगून त्याला अर्जुनाच्या मदतीला पाठवले. युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी भीमावर सोपवून सात्यकी निघाला. द्रोण व कृतवर्मा यांचा जोरदार विरोध मोडून काढून सात्यकी सैन्यात घुसला. अनेक वीरांचा व सैन्याचा पुन्हापुन्हा संहार करून शेवटी तो अर्जुनाजवळ पोचला. सात्यकी जाऊनहि बराच वेळ झाला तरीहि अर्जुनाची खुशाली कळेना तेव्हा मोठा धोका पत्करून युधिष्ठिराने भीमालाहि अर्जुनाच्या मदतीला पाठवले. नाइलाजाने, युधिष्ठिराच्या संरक्षणाचा भार धृष्टद्युम्नावर सोपवून भीम निघाला. त्यालाहि द्रोणाशी जोरदार सामना करावा लागला. द्रोणाची पर्वा न करता, अनेक वीरांचा व सैन्याचा संहार करीत तोहि अर्जुनापर्यंत पोचला व त्याला खुशाल पाहून भीमाने मोठमोठ्याने गर्जना केल्या. त्या ऐकून अर्जुन व कृष्ण यांनीहि केल्या. त्या ऐकून युधिष्ठिराची खात्री पटली की अर्जुन, सात्यकी व भीम एकत्र व सुखरूप आहेत. ’सात्यकी व भीम सैन्यात घुसले कसे व आता जयद्रथाचे काय होणार’ अशी तक्रार घेऊन दुर्योधन पुन्हा द्रोणापाशी गेला. तेव्हा, ’सात्यकी व भीम आता येथे नाहीत तेव्हा मी आता युधिष्ठिराला पकडण्याचा निकराचा प्रयत्न करतो, तुम्ही सर्वानी अर्जुनाचा प्रतिकार करा’ असे सांगून द्रोणाने त्याला परत पाठवले. आता पुन्हा सैन्यात शिरलेल्या युधामन्यु व उत्तमौजा यांची दुर्योधनाशी गाठ पडली. दुर्योधनाने त्याना हारवले पण त्यानीहि दुर्योधनाला रथहीन केले. भीम व कर्ण यांच्या वारंवार चकमकी झाल्या. भीमाने दरवेळी कर्णाला मार देऊन पळवून लावले. सतरा वेळा त्याचे धनुष्य तोडले. त्याच्या व दुर्योधनाच्या देखतच, त्याच्यावर चालून येणार्‍या अनेक कौरवांचा वध केला. अनेक चकमकींनंतर अखेर कर्णाने भीमाचा पराभव केला व त्याला दुरुत्तरे केली. अखेरपर्यंत भीमाने हार मानली नाहीच वा पळूनहि गेला नाही. त्याने कर्णाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. कर्णाचेहि धनुष्य तुटले होतेच. अर्जुन भीमाच्या मदतीला आल्यावर अखेर कर्ण व भीम इतरांच्या रथांवर बसून दूर झाले. अर्जुनाने यावेळी कर्णावर सोडलेला घातक बाण मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच तोडून टाकला व आपण पळून गेला! कर्ण वांचला. इकडे सात्यकी व भूरिश्रवा यांचे तुंबळ युद्ध होऊन भूरिश्रवा सात्यकीचे केस पकडून त्याचे डोके उडवण्याच्या प्रयत्नात आहे असे कृष्णाने अर्जुनाच्या नजरेला आणले तेव्हा अर्जुनाने दुरूनच बाण सोडून भूरिश्रव्याचा हातच तोडला! नंतर सात्यकीने भूरिश्रव्याला मारले. जयद्रथाच्या रक्षणासाठी नेमलेल्या सहा वीरांपैकी भूरिश्रवा मेला व भीमाने कर्णाला वारंवार हरवून जखमी व नामोहरम केले त्यामुळे अर्जुनाला फार मदत झाली. कर्णाने दुर्योधनाशी कबुली दिली कीं ’भीमाकडून मी आज एवढा मार खाल्ला आहे की युद्धात उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी नाइलाजाने उभा आहें.’ यानंतर जयद्रथाच्या प्रत्यक्ष वधाचे वर्णन पुढील भागात वाचा.