Get it on Google Play
Download on the App Store

इस्लाममधील बहुपत्नीत्व !!

इस्लाममध्ये बहुपत्नीत्वाचा मुद्दा खूपच वादग्रस्त आहे. कट्टरपंथी मुस्लिम उलेमांचे असे मत आहे की, ही प्रथा इस्लामी शरियतचा भाग आहे. त्यामुळे कुठलेही योग्य वा सयुक्तिक कारण न देता पुरुषाला वाटलं तर तो चार बायका (पत्नी) करू शकतो. दुसऱ्या बाजूने आधुनिकतावादी आणि स्त्री-अधिकारांच्या समर्थकांचे म्हणणे असे आहे की, बहुपत्नीत्वाला विशिष्ट परिस्थितीतच मान्यता दिली गेली आहे. तीही कडक अटी लागू करूनच! त्यात सगळ्या पत्नींना त्या पुरुषाने समान न्याय देणे अभिप्रेत आहे. पुरुष एखादी स्त्री त्याला आवडली किंवा तिच्या सौंदर्याची त्याला भुरळ पडली म्हणून एकापेक्षा अधिक विवाह करू शकत नाही. कुराणाची रीत एकपत्नी विवाहाचीच आहे. परंतु काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीत (न्यायासाठी कडक अटी लागू करून) बहुपत्नीत्वाची परवानगी दिली गेली आहे.

कट्टरपंथी उलेमा जी कारणे देऊन बहुपत्नीत्वाचे समर्थन करतात, त्यांचा कुराणामध्ये साधा उल्लेखही नाही. ते असा युक्तिवाद करतात की, पुरुषाच्या लैंगिक गरजा या स्त्रीपेक्षा अधिक असतात. स्त्रीशी गरोदरपणात आणि प्रसूतीकाळात कामक्रीडा करणे शक्य नसते, त्यामुळे या कालावधीत पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नींची आवश्यकता भासते. त्यांचे असेही म्हणणे आहे की, एखादी स्त्री असाध्य रोगाने ग्रस्त असेल तर तिला घटस्फोट देऊन मानसिक आघात देण्यापेक्षा दुसरा विवाह करणे अधिक सयुक्तिक असते. आणि समजा, एखाद्या स्त्रीमध्ये वंध्यत्व आले असेल तर तिला अधिक दुखावण्यापेक्षा दुसरा विवाह करणे श्रेयस्कर ठरेल.
ही कारणे नि:शंकपणे व निर्विवादपणे कुराणात दिलेली नाहीत. आणि महम्मद पैगंबरसाहेबांच्या सुन्नतमध्येही (हदीस) त्याचा उल्लेख आढळत नाही. ही कारणे काही उलेमांनी बहुपत्नीत्व न्याय्य ठरवण्यासाठी दिलेली आहेत. याव्यतिरिक्त ते हेही कारण देतात की, स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे बहुपत्नीत्वाची ही प्रथा स्त्रियांना बदनामीपासून वाचविण्यासाठी अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचा भंग न करता त्यांना सन्माननीय जीवन जगणे शक्य करते.

आधुनिकतावादी आणि स्त्री-अधिकाराचे पुरस्कर्ते ही सर्व कारणे अमान्य करतात. त्यांचे म्हणणे असे की, विज्ञान आणि जीवशास्त्रानुसार हे सिद्ध होत नाही की, स्त्रियांच्या लैंगिक गरजा पुरुषांच्या तुलनेत कमी असतात. मात्र, स्त्रियांची सामाजिक जडणघडणच अशी झालेली असते, की त्या लैंगिकतेला मुरड घालताना दिसतात. त्यांना सुयोग्य वातावरण मिळाले तर त्याही लैंगिकदृष्टय़ा पुरुषांइतक्याच सक्रिय होऊ शकतील. स्त्री-अधिकारांच्या समर्थकांचे असेही म्हणणे (मानणं) आहे की, पुरुष हा केवळ लैंगिक प्राणी नाही, की तो आपल्या पत्नीच्या गरोदरपणी आणि प्रसूतीकाळात स्वत:च्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. हजारो पुरुष संयम पाळतात. सर्व पुरुषांचा कल बहुपत्नीत्वाकडे असत नाही. उलटपक्षी अधिकांश पुरुष एकच विवाह करतात आणि जेव्हा कधी त्यांची पत्नी दीर्घकाळाकरिता आजारी पडते, त्यांच्या लैंगिक गरजा पूर्ण करू शकत नाही, तेव्हाही ते आपल्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवतात. अशावेळी आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासाठी ते करत असलेला त्याग मोलाचा असतो. विवाह हा फक्त लैंगिक पूर्तीसाठी असत नाही; विवाहसंस्था त्यापेक्षा खूपच व्यापक आहे. त्यात दोन जीवांची आयुष्यभराची साथसोबत अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ‘बहुपत्नीत्व’ ही एक मध्ययुगीन संस्था आहे, जी पुरुषांनी आपली लैंगिक भूक शमविण्यासाठी आणि स्त्रीला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी बनविली आहे.

प्रश्न वंध्यत्वाचाच असेल तर प्रजननासाठी दुसरा विवाह करण्यात काही अंशी तरी तथ्य जाणवते. कारण विवाहाच्या उद्देशांमध्ये ‘प्रजनन’ हा एक उद्देश आहे. परंतु आपल्या समाजात मूल न होण्यास स्त्रीलाच जबाबदार धरले जाते. प्रत्यक्षात पुरुषांतसुद्धा वांझपण असू शकते. आणि बऱ्याचदा तसे असतेही. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय तपासणीतून जोवर हे सिद्ध होत नाही की, संबंधित स्त्री वांझ आहे, तोवर प्रजननासाठी दुसऱ्या स्त्रीशी विवाह करण्याची घाई पुरुषाने करू नये. जेव्हा हे सिद्ध होईल की, पहिली पत्नी मूल जन्माला घालण्यास वैद्यकीयदृष्टय़ा असमर्थ आहे, तेव्हा एखाद्या वेळेस दुसरी पत्नी करणे हे न्याय्य ठरू शकेल.

विज्ञानाने आता जी प्रगती केली आहे, त्यामुळे नवनवीन शक्यता जन्माला आल्या आहेत. ‘टेस्ट टय़ूब बेबी’चेच उदाहरण घेता येईल. अजूनही ‘टेस्ट टय़ूब बेबी’च्या बाबतीत इस्लामला संमत असणाऱ्या ‘इज्म्मा’द्वारे उलेमांमध्ये स्वीकृती झालेली नाही. तरी हा प्रश्न त्या संबंधित व्यक्तींच्या सदसद्विवेकबुद्धीवर सोडायला हवा. काही सुज्ञ मुस्लीम याबाबतीत संभ्रमात आहेत. पत्नी वैद्यकीयदृष्टय़ा संतती देण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाल्यास पती कुठल्याही प्रकारे बळजबरी न करता आपल्या पत्नीकडून दुसऱ्या विवाहाची संमती घेऊ शकतो. परंतु यातही कुराणाने दिलेल्या आदेशानुसार, पती दोन्ही पत्नींना समान न्याय व वागणूक देण्यास समर्थ असायला हवा.

बहुपत्नीत्वासाठी आणखी एक तर्क मांडला जातो की, स्त्रियांनी अवहेलनापूर्ण जीवन व्यतीत करण्यापेक्षा त्यांना सहपत्नीचा दर्जा देणे उचित ठरेल. खरं तर असे खूपच कमी समाज आहेत, जिथे स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. महायुद्धांच्या वेळी जेव्हा लाखो माणसं मारली गेली, तेव्हा निश्चितपणे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होती. परंतु ही स्थिती तात्पुरती असते, कायमस्वरूपी नसते. कदाचित अशा वेळी काही अंशी बहुपत्नीत्वाला मान्यता दिली जाऊ शकेल. मात्र असे म्हणणे उचित होणार नाही की, स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे समाजात वेश्यावृत्ती बोकाळते. जिथे पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणीही वेश्यावृत्ती पाहावयास मिळते.

वेश्यावृत्तीची अनेक कारणे आहेत. जागतिक इतिहासाचा मागोवा घेतल्यास वेश्यावृत्ती सर्वत्र आढळते. संपत्तीचे असमान वितरण, रोजगारासाठी पुरुषांचे इतर देशांत वा शहरांत स्थलांतरण, अतिदारिद्रय़, नैतिक मूल्यांचा ऱ्हास आणि संघटित गुन्हेगारी या बाबीही वेश्यावृत्तीस कारणीभूत आहेत. बहुपत्नीत्वामुळे वेश्यावृत्तीचे उच्चाटन केले जाऊ शकते, हा चुकीचा समज आहे. या संदर्भात कठोर कायदे लागू केल्यास ते वेश्यावृत्ती थोपवू शकतील, परंतु तिचे समूळ उच्चाटन शक्य नाही.

बहुपत्नीत्वाला पुष्टी देणारे असे सगळे तर्क फोल ठरतात. इतका प्रदीर्घ काळ बहुपत्नीत्वाची व्यवस्था टिकून राहण्याची कारणे वेगळी आहेत. ती समजून घेणे क्रमप्राप्त आहे.
बहुपत्नीत्वाच्या संदर्भात कुराणात जी वचने आली आहेत, त्यांचा विचार विलगपणे न करता कुराणाची जी अंतस्थ प्रेरणा आहे, ती लक्षात घेऊनच त्याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. जिथवर एकापेक्षा अधिक पत्नींचा संबंध आहे, त्यासंदर्भात कुराणात दोन वचने दिली गेली आहेत. ती म्हणजे ४:३ आणि ४:१२९; परंतु कुराणाचे अंतरंग समजून घेण्यासाठी या दोन वचनांव्यतिरिक्त आणखीन काही वचनेसुद्धा विचारात घ्यावी लागतात. बहुपत्नीत्वासारख्या वादग्रस्त विषयासंदर्भात कुराणाची दृष्टी जाणून घेण्यासाठी ही वचने पण तितकीच महत्त्वाची आहेत.

४:३ या पहिल्या वचनात चार पत्नी करण्यास परवानगी दिलेली दिसते; वचन क्रमांक ४:१२९ मात्र बहुपत्नीत्वामुळे उद्भवणाऱ्या संभवित  (संभाव्य) धोक्यापासून सावध/ सतर्क करते. दोन्ही वचने एकत्रितपणे वाचल्यास अल्लाहचा त्यामागचा असलेला नेमका उद्देश समजतो. पहिल्या वचनात म्हटले गेले आहे, ‘जर तुम्हाला भय असेल की, तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही, तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील, त्यांच्यापैकी दोन, तीन किंवा चार जणींशी विवाह करा; परंतु जर तुम्हाला भय असेल की, तुम्ही त्यांना समान वागणूक देऊ शकणार नाही (न्याय देऊ  शकणार नाही) तर मग एकच पत्नी करा किंवा विधिवत जे तुमच्या अधिकारात आहे ते करा’. ४:३ या वचनाचे विविध पद्धतीने विश्लेषण केले गेले आहे. त्यात स्पष्टता नाही, की एका वेळी दोन, तीन किंवा चार (पत्नी असू शकतात) की संपूर्ण आयुष्यात.

याचा अर्थ एकाच वेळी दोन, तीन किंवा चार पत्नी असा आहे, तरीही कुराण कुठल्याही पुरुषाला मनमानी करण्याचा अधिकार देत नाही. कुराणाने सर्व पत्नींशी समान न्यायाने आणि समान वागणूक देण्यासाठी कडक अटी लागू केल्या आहेत आणि जर तुमच्या मनात याबाबतीत भय असेल की, तुम्ही त्यांच्यासोबत समान न्याय करू शकणार नाहीत, तर फक्त एकीशीच विवाह करा. अशा प्रकारे कुणी जरी शब्दश: एकच वचन वाचले, तरीही ज्या गोष्टीवर स्पष्टपणे जोर दिला गेला आहे तो म्हणजे सर्व पत्नींशी समान आणि योग्य वागणूक देण्याबाबत, एकापेक्षा अधिक पत्नी करण्याबाबत नाही. या बाबतीत निर्णय फक्त पतीद्वारा घेता येणार नाही की, तो आपल्या पत्नींना समान आणि योग्य वागणूक देतो अथवा नाही?

या वचनात जिथे सांगितले गेले आहे की, जर तुम्हाला या गोष्टीचे भय वाटत असेल की, तुम्ही त्यांच्यासोबत समान न्यायाने वागणार नाहीत, ही गोष्ट संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने मांडली जाते आणि यासाठी ‘न्यायिक संस्था’ (अदालाह) जे समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तेच हे ठरवू शकतात की, कुणी व्यक्ती दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पत्नीसोबत समान आणि योग्य न्यायाने वागण्याची कुवत राखतो किंवा नाही आणि हेसुद्धा की, त्याला याची आवश्यकता, गरज  आहे किंवा नाही. यातून हे स्पष्ट होते की, एकापेक्षा अधिक विवाह करणे (बहुपत्नीत्व) हा एक व्यक्तिगत निर्णय नाही. ती एक समाजनियंत्रित बाब आहे. त्यावर समाजाचे नियंत्रण अभिप्रेत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, असा निर्णय बऱ्याचदा व्यक्तिगत पातळीवर घेतला जातो. जणू काही हा त्या व्यक्तीला दिलेला विशेषाधिकारच आहे आणि ज्यात सामाजिक हस्तक्षेपाला जागा नाही. दुसऱ्या बाजूने पाहता, कुराणाचा अंत:स्थ हेतू असा आहे की, ज्यात सामाजिक हस्तक्षेपाची निकड मांडली जाते आणि पत्नीसोबतच्या समान आणि योग्य न्यायपूर्ण वागणुकीला अत्यावश्यक मानले जाते.

या गोष्टीसंदर्भात असाही वाद उपस्थित केला जातो की, ‘समान आणि योग्य वागणूक याचा अर्थ फक्त सर्व पत्नींना समान खर्च आणि सुविधा देणं एवढंच नव्हे, तर त्यात समान प्रेम देणंही अंतर्भूत आहे. काही भाष्यकार प्रामुख्याने मुतझिला पंथाचे (इस्लाममधील एक पंथ) यावर जोर देतात की, सर्व पत्नींसोबत समान प्रेम करणं ही एक आवश्यक अट आहे आणि त्यांचा युक्तिवाद असा आहे की, समान प्रेम करणं ही मानवी दृष्टीने अशक्यप्राय गोष्ट आहे. (पुरुष नेहमीच कुणा एका पत्नीवरच इतर एक किंवा अनेक पत्नींपेक्षा अधिक प्रेम करण्याचा संभव अधिक असतो.) त्यामुळेच कुराणाने बहुपत्नीत्वाला बंदी घातली आहे. सगळ्या पत्नींसोबत न्यायाने वागणे, सर्व पत्नींना समान वागणूक देणे ही इतकी महत्त्वपूर्ण बाब आहे.

अशा प्रकारे वचन क्रमांक ४:३ मध्ये अन्याय होईल याची भीती दोनदा दर्शविली आहे. बहुपत्नीत्वाविषयीच्या नैतिक पैलूला इतक्या हलकेपणाने घेऊन चालणार नाही. त्यामुळेच एकतर या प्रथेला पूर्णपणे प्रतिबंध घालणे किंवा त्यावर कठोर नियंत्रण ठेवणे आणि दुसरी पत्नी करण्याचा अधिकार पूर्णत: त्या व्यक्तीवर न सोडता त्यात सामाजिक हस्तक्षेप असणेही जरुरीचे आहे. बहुपत्नीत्वावरील वचन क्रमांक ४:३ आणि दुसरे वचन क्रमांक ४:१२९ ही दोन्ही वचने संयुक्तपणे वाचली जायला हवीत. ही वचने इतर बाबींचाही खुलासा करतात की, तुमची कितीही तीव्र इच्छा असो तरीसुद्धा तुम्हाला कदापि सर्व पत्नींसोबत समान न्याय करणे शक्य होणार नाही. परंतु असेही व्हायला नको की फक्त एकीलाच झुकतं माप देऊन दुसरीला मात्र वाऱ्यावर सोडले जाईल. जर आपसांत मैत्रीपूर्ण सामंजस्य राहिले आणि आत्मसंयम राखण्याची सवय लागली, जर तुम्ही आपली वागणूक नीटनेटकी ठेवलीत, अल्लाहचे भय बाळगत राहिलात तर अल्लाह क्षमाशील आणि कृपा करणारा आहे.

या वचनात सर्व पत्नींसोबत समान आणि योग्य न्याय या मुद्दय़ाबाबत इतकी स्पष्टता आहे की हे वचन बहुपत्नीत्वाच्या प्रथेचे अस्तित्वच जवळपास नाहीसे करते. ‘तुम्ही न्याय करू शकणार नाही. मग तुमची तशी कितीही तीव्र इच्छा का असेना.’ असे जे विधान येते त्यामुळे याविषयी अधिक चर्चेची गरजच भासत नाही. मानवी पातळीवर सर्व पत्नींसोबत समानतेने वागणे अशक्य आहे. (विशेषत: प्रेमासंदर्भात) तेव्हा एका ‘स्त्री’ला वाऱ्यावर सोडू नये आणि दुसऱ्या ‘स्त्री’च्या पूर्णपणे आहारीही जाऊ नये.

प्राथमिक स्तरावर तर कुराण ‘गुलामगिरी’, ‘बहुपत्नीत्व’ अशाच काही समान सामाजिक प्रश्नांबद्दल काही सुधारणा सुचवितो. कुराण प्रथम मुसलमानांना सांगते की गुलामाशी माणुसकीने वागा आणि पुढे जाऊन असेही सुचविते की, जर तुम्ही रोजे करू शकत नसाल, तर त्याऐवजी एखाद्या गुलामाला मुक्त करा. तुम्ही आपल्या गुन्ह्य़ाचे प्रायश्चित म्हणून एखाद्या गुलामाला मुक्त करू शकता. बहुपत्नीत्वाबाबतीतही कुराणाने असाच दृष्टिकोन बाळगला आहे. त्याचबरोबर हेही सांगितले आहे की, ‘आपण सर्व आदमची लेकरे आहोत’ (लकडकराना बनी आदम) त्यामुळेच आदमच्या सर्व लेकरांना एकसमान पातळीवर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यात कुणीही मालक किंवा गुलाम नाही.  वास्तविक पाहता कुराणाने अनाथ आणि विधवांवरील अन्याय दूर करण्याच्या हेतूने बहुपत्नीत्वाच्या प्रथेला परवानगी दिली होती. (यतामा हा अरबी शब्द विधवा या अर्थानेही वापरला जातो.) कुराणावरील भाष्य ‘जमाक्षरी लिखित अल-कशाफ (खंड-क बैरूत १९७७ पृष्ठ ४९६) च्या अनुसार- ‘अरब लोक सुंदर आणि श्रीमंत अनाथ मुलींशी आणि विधवांशी विवाह करीत असत. (ते चारपेक्षा कितीतरी जास्त असत.) आणि त्यांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करीत, त्यांच्यावर अन्याय करीत. तात्पर्य, कुराणाने त्या अनाथांना अन्यायापासून वाचविण्यासाठी त्या अरबी लोकांना चार विवाह करण्याची मुभा दिली होती. प्रथम अरब इच्छेनुसार अगणित विवाह करू शकत होते. कुराणाने त्याला शह देत ती संख्या फक्त चापर्यंत सीमित केली.

समाजात बहुपत्नीत्वाची प्रथा अशा प्रकारे (‘पत्नी’च्या संख्येत कुठल्याही प्रकारचे बंधन न पाळता) पूर्वीपासूनच अस्तित्वात होती आणि अनाथांवर अन्यायही होत होता. यासाठी कुराणाने ‘न्याय’ ही सर्वात मूलभूत नैतिकता मानली आहे. ४:३ या वचनानुसार एका बाजूने अनाथ मुलींच्या संपत्तीसाठी होणारा दुरुपयोग रोखण्यात आला. (जे अत्यावश्यक होते) आणि दुसऱ्या बाजूने कुठलेही बंधन न पाळता केलेल्या पत्नींवर होणाऱ्या अन्यायालाही रोखण्यात आले. या वचनाने एका दगडात दोन पक्षी मारले. एका अनाथांसोबत न्याय करणे आणि पत्नींची संख्या चापर्यंत मर्यादित केल्याने असंख्य निराधार पत्नींना न्याय देणे, त्यांना समान, योग्य वागणूक देणे.

बहुपत्नीत्व प्रथेवर कुराणातील दुसऱ्या वचनात (४:१२९) मध्ये हे स्पष्टपणे मांडले आहे की,  तुमची कितीही आंतरिक इच्छा असो, सर्व पत्नींसोबत समान न्यायाने वागणे तुम्हाला शक्य नाही. त्यासाठी पुरुषाला सावध केले आहे की, पहिल्या पत्नीला वाऱ्यावर सोडू नका. त्यामुळेच दोन्ही वचने एकत्रितपणे वाचली गेल्यास एकपत्नीत्वाच्या तत्त्वालाच दुजोरा मिळतो आणि बहुपत्नीत्वाला मात्र काही विशेष परिस्थितीतच मान्यता दिली जाते.

कुराणाचा अंतस्थ हेतू हा ‘बहुपत्नीत्वा’च्या प्रथेला नष्ट करणं हाच आहे. ते हळूहळू साध्य होईल. काही भाष्यकारांनी याकडेही लक्ष वेधले आहे की, वचन क्रमांक ४:३ हे औहोदच्या युद्धानंतर अवतरले आहे. या युद्धाची पाश्र्वभूमी पाहिल्यास या युद्धात मुस्लिम पुरुष लोकसंख्येपैकी १०  टक्के मुस्लिम पुरुष मरण पावले. (मारले गेले.) अनेकजण अनाथ झाले, स्त्रियांना वैधव्य आले. अशा स्त्रियांचे पालनपोषण करणे, त्यांना आधार देणे गरजेचे होते. बहुपत्नीत्वाची प्रथा सदैव चालू राहावी, असा कुराणाचा कधीच उद्देश नव्हता.

कुराणाचे सुप्रसिद्ध अनुवादक अब्दुल्लाह युसूफअली यांनी वचन क्रमांक ४:३ च्या तळटिपेत लिहिले आहे, ‘अज्ञानकाळात पत्नींची संख्या जास्तीत जास्त चापर्यंतच काटेकोरपणे मर्यादित करण्यात आली होती, पण तीही याच अटीवर की, त्या पत्नींना ऐहिक आणि अऐहिक (प्रेम-जिव्हाळा) ही दोन्ही सुखे दिली जावीत आणि त्यात त्यांना समान वागणूक दिली जावी. खरे पाहता, या अटींची पूर्तता करणे ही अत्यंत कठीण बाब आहे, हे मी जाणतो म्हणूनच मी एकपत्नीत्वाचीच मागणी करतो.’

बहुपत्नीत्वाविषयी ४:३ या वचनाव्यतिरिक्त अनेक ठिकाणी चर्चा केली गेली आहे. या वचनांना समग्रतेने पाहणे अत्यावश्यक आहे. कुराणात एक पती आणि एक पत्नीसाठी ‘ज़्ाौज’ हा शब्द आलेला आहे, ज्याचा अर्थ ‘जोडपे’ असा आहे. मूलत: याचा अर्थ एक पती आणि एक पत्नी म्हणजे ‘जोडपे’ असा असल्याने त्यात एक पती आणि अनेक पत्नी (बायका) अभिप्रेत नाही. पहिले पैगंबर आदम यांना फक्त एक पत्नी होती. तिचे नाव ‘हव्वा’ होते. कुराणाने पती-पत्नीला एकमेकांचा पोशाख म्हणूनही संबोधले आहे.

स्त्री-पुरुष समानता आणि मैत्री हा या (२:१८७), (९:२७) वचनांचा गाभा आहे. वचन क्रमांक ३३:३५ व २:२२८ सुद्धाहेही प्रत्येक बाबतीत स्त्री-पुरुषाला समान मानते आणि बहुपत्नीत्वाला मात्र क्वचितच मान्यता देते. जिथपर्यंत पवित्र पैगंबरसाहेबांच्या सुन्नतचा संबंध आहे तिथेही बहुपत्नीत्वापेक्षा एकपत्नी विवाहाचाच अधिक स्वीकार केला आहे, अधिक पसंती दर्शविली आहे. पैगंबरसाहेबांनी त्यांची पत्नी खदमीजा, जी त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी होती, ती हयात असेपर्यंत तिच्याशी पूर्णत: प्रामाणिक राहिले. तिच्या हयातीत त्यांनी दुसरा विवाह केला नाही. ते अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ पती होते. त्यांनी खदमीजाच्या मृत्यूनंतर आयेशाशी विवाह केला. त्यांनी केलेल्या विवाहांपैकी फक्त आयेशाच कुमारिका होती. त्यांच्या इतर पत्नी एकतर विधवा होत्या, नाहीतर घटस्फोटित होत्या आणि त्यांचे सगळे विवाह हे राजनैतिक स्वरूपाचे आणि टोळ्यांशी केलेल्या करारातून झाले होते. त्यांचा विवाहाचा उद्देश हा लैंगिक गरजा पूर्ण करणे हा नव्हता. त्यांची अशी इच्छा असती तर त्यांनी तरुण मुलींशीच (कुमारिकेशी) विवाह केले असते; परंतु आयेशानंतर त्यांनी कुठल्याही कुमारिकेशी विवाह केला नाही. पैगंबरसाहेबांच्या मुलीचे (फातिमा)चे पती हजरत अली यांना ती हयात असतानाच दुसरा विवाह करावयाचा होता. पैगंबरसाहेबांनी याबाबत अत्यंत कडक शब्दांत विरोध दर्शविला होता.

आज स्त्री अधिकारांविषयी अधिक सजगता आली आहे, त्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे.  ‘स्त्री’च्या प्रतिष्ठेची पुन:स्थापना करणे, प्रत्येक बाबतीत स्त्री  पुरुषाच्या

बरोबरीने समान भागीदार आहे, हे समाजात प्रस्थापित होणे, ही कुराणाची मूलभूत मागणी आहे.
मूळ लेखक : डॉ. असगरअली इंजिनीअर
अनुवाद : नंदिनी चव्हाण
सौजन्य – लोकसत्ता