Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 26

१ सम्यक् दृष्टि :- दु:खाचें ज्ञान, दु:खसमुदायाचें ज्ञान, दु:खनिरोधाचें ज्ञान, आणि दु:खनिरोधगामी मार्गाचें ज्ञान, याला सम्यक्  दृष्टि असें म्हणतात. जग अनित्य म्हणजे बदलणारें आहे. प्रपंच दु:खमय आहे, आणि आत्मा म्हणून अविनाशी आणि अविकारी असा पदार्थ नसून कर्मानुसार बदलणारा आहे, अशा यथार्थ ज्ञानाला सम्यक्  दृष्टि असें म्हटलें असतां चालेल. कारण अशा ज्ञानानेंच चार आर्य सत्यांचें ज्ञान होणें शक्य आहे.

२. सम्यक् संकल्प
:- नैष्कर्म्यसंकल्प म्हणजे एकांतवाससुखाची आवड, अव्यापादसंकल्प म्हणजे प्राणिमात्रांवर शुद्ध प्रेम, आणि अविहिंसासंकल्प म्हणजे दुसर्यास किंवा आपणास त्रास होऊं नये अशी इच्छा. या तीन संकल्पांना सम्यक्, संकल्प म्हणतात.

३. सम्यक्  वाचा:
- खोटें न बोलणें, चहाडी न करणें, कठोर शब्द न उच्चारणें, आणि वृथा भाषण न करणें यांना सम्यक् वाचा म्हणतात.

४. सम्यक् कर्मान्त (कर्म):- प्राणघात न करणें, चोरी न करणें व परदारागमन न करणें यांना सम्यक्  कर्मान्त म्हणतात.

५. सम्यक् आजीव:- वाईट मार्गानें आपली उपजीविका न करितां सन्मार्गानेंच ती करणें, याला सम्यक्  आजीव म्हणतात.

६. सम्यक् व्यायाम :- जे वाईट विचार मनांत आले नसतील त्यांना उत्पन्न होण्यास सवड न देण्याविषयीं प्रयत्न, जे वाईट विचार मनांतल उद्भवले असतील, त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न, जे सुविचार मनांत उद्भवले नसतील, ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न, व जे सुविचार मनांत उद्भवले असतील, ते वाढवून त्यांना पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न या चार मानसिक प्रयत्नांला सम्यक् व्यायाम म्हणतात.

७. सम्यक् स्मृति
:- शरीर अपवित्र पदार्थाचे बनलें आहे हा विवेक जागृत ठेवणें, शरीरांतील सुखदु:खदि वेदनांचे वारंवार अवलोकन करणें, स्वचित्ताचें अवलोकन करणें, आणि कार्यकारणपरंपरा इत्यादि तात्त्विक गोष्टींचे चिंतन करणें, या चार प्रकारांनी चित्ताला जागृत ठेवणें, याला सम्यक्  स्मृति म्हणतात.

८ सम्यक् समाधि:
- सगळ्या कामवासनांचा निरोध करून व इतर दुष्ट मनोवृत्तींचा निरोध करून योगी वितर्क आणि विचार यांनी युक्त आणि विवेकापासून उत्पन्न झालेल्या प्रीतीनें आणि सुखानें युक्त असें प्रथम ध्यान संपादन करितो; वितर्क आणि विचार हे शांत झाल्यावर जी चित्ताची प्रसन्नता, जी चित्ताची एकाग्रता, तिनें युक्त, वितर्कविचारविरहित व समाधीपासून उत्पन्न झालेल्या प्रीतीनें आणि सुखानें युक्त असें द्वितीय ध्यान संपादन करितो; प्रीतीच्या त्यागानें तो उपेक्षायुक्त होतो, व जागृत (स्मृतिमान) होत्साता समाधिसुखाचा अनुभव घेतो, त्याला आर्य जन उपेक्षायुक्त, स्मृतिमान आणि सुखी असें म्हणतात, अशा प्रकारेंच तो तृतीय ध्यान संपादन करितो; सौमनस्य आणि दौर्मनस्य यांचा पूर्वीच नाश झाल्यावर सुख आणि दु:ख यांचा निरोध करून तो सुखदु:खविरहित व उपेक्षा आणि जागृति (स्मृति) यांनी परिशुद्ध असें चतुर्थ ध्यान संपादन करतो. याप्रमाणें चार ध्यानें संपादन करणें याला सम्यक् समाधि असें म्हणतात. (हीं ध्यानें संपादण्याचा मार्ग दुसर् व्याख्यानांत सांगितला आहे.)

बुद्ध भगवंतानें या आर्य अष्टांगिक मार्गाला मध्यम मार्ग असें म्हटलें आहे. त्यांचे प्रत्येक अंग दोन अंतांच्या मध्यें आहे. उदाहरणार्थ, चैनी लोकांची दृष्टी म्हटली म्हणजे खावें, प्यावें, मजा मारावी. हा दृष्टीचा एक अंत. तापसी लोकांची दृष्टि म्हटली म्हणजे व्रतांनी शुद्धिं, तपानें, शुद्धि, देहदंडनानें शुद्धि हा दृष्टीचा दुसरा अंत, पहिला  अंत चैनीचा आणि दुसरा अंत देहदंडनाचा. यांच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे चार आर्यसर्त्यांचे यथार्थ ज्ञान. चैनी लोक म्हणतात वाटेल ते संकल्प संकल्पावे. तापसी म्हणतात संकल्पांचा समूळ नाश करावा, या दोन अंतांच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे सम्यक् संकल्प. या प्रमाणें बाकीं अंगांचीहि मध्यवर्तिता जाणावी.

४ त्रिपिटक ग्रंथ

त्रिपिटक हा पालिभाषेंतील मुख्य ग्रंथ होय. हा महाभारत ग्रंथाच्या तिप्पटीनें मोठा आहे. म्हणजे याची ग्रंथसंख्या सरासरी तीन लक्ष आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. हीं ध्यानें संपादण्याचा मार्ग दुस-या व्याख्यानांत सांगितला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------