Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 25

अबला नं बलीयन्ति मद्दन्ते नं परिस्सया।
ततो नं दु:खमन्वेति भिन्नं नावमिवोदक || २ (२ सुत्तनिपात, कामसुत्त)

दुर्बळ लोक याचा मत्सर करितात; कामक्रोधादि अभ्यंतर व अग्नि, चोर इत्यादी बाह्य शत्रु त्याला तुडवितात; आणि त्यामुळें फुटक्या होडींत पाणी शिरतें त्याप्रमाणे दु:ख त्याच्या अंत:करणांत शिरतें.

भवतृष्णा म्हणजे जीविततृष्णा, इजमुळेंहि जगाच्या दु:खांत मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे आयुष्य प्राप्त झालें असतांहि मनुष्याची तृप्ति होत नाहीं. मेल्यावरहि सुख मिळावें, आत्मा अमर व्हावा अशी त्याची इच्छा असते. तीस अनुसरून तो व्रतांचे आणि उपवासांचें आचरण करतो, यज्ञयाग करून प्राण्याला दु:ख देण्यास तयार होतो, व येणेंकरून आपल्या आणि इतर प्राण्यांच्या दु:खांत भर घालतो.

विभवतृष्णा म्हणजे विनाशतृष्णा, जगांतून नाहीसें होऊन जाण्याची तृष्णा. या तृष्णेला बळी पडलेले लोक आपल्याहि फायद्याकडे पाहत नाहींत, आणि दुसर्याच्याहि फायद्याकडे पाहत नाहीं. एवढय़ा तेवढय़ासाठीं आत्महत्या करण्यात ते तयार असतात. आपण मेलों म्हणजे सारें जग संपलें असें त्यांचें म्हणणें असतें. ज्यांना आपल्या जीविताची परवा नाहीं. त्यांनां दुसर्याच्या जीविताची कोठून असणार? दुसर्या प्राण्यांस कितीहि उपद्रव, झाला, तरी त्यापासून अशा लोकांच्या अंत:करणांत दयेचा उदय होणें शक्य नाहीं. यांचे जीवित नीरस झालेलें असतें. यांना धार्मिक सुखाची गोडी मुळींच माहीत नसते. एकंदरींत अशा निर्दयपणानें आणि नीरसपणानें इतरांचें आणि आपलें दु:ख ते वाढवीत असतात.

दु:खनिरोध- दु:खनिरोध म्हणजे दु:खाचें आकलन, दु:खाचा नाश. हा तृष्णानाशानेंच करतां येतो. वर सांगितलेल्या तिन्ही तृष्णांचा नाश केला, तरच दु:खाचा नाश होणार आहे. इतर उपाय निरुपयोगी आहेत. कामवासनेची तृप्ति करण्याच्या प्रयत्नानें दु:खाचा अंत होणार नाहीं; व्रत, उपवास, यत्र, याग, इत्यादिकांचें आचरण करून स्वर्गवासाची प्राप्ति करून घेतली, तरी दु:खाचा अंत होणार नाहीं; किंवा आपण जगांतून नाहींसे झालों तरी दु:खाचा अंत होणार नाही.

दु:खनिरोधगामिनी प्रतिपत् (मार्ग):- तृष्णानाशानें दु:खनाश होतो, हें समजले. पण तृष्णानाशाला कांहीं उपाय आहे कीं नाहीं? अंगांत शिरलेल्या शल्यापासून वेदना होता, हें समजलें, परंतु ते शल्य सुरक्षितपणे काढण्याला जर उपाय माहीत नाहीं, तर नुसतें एवढें समजण्यापासून काय फायदा? म्हणून दु:खाचा निरोध करण्याला उपाय या चवथ्या आर्य सत्यांत सांगितला आहे. हा उपाय म्हटला म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय.