Get it on Google Play
Download on the App Store

*धर्म 9

२ मैत्री

द्वेषचरिताला मैत्रीभावना पथ्यकारक आहे.

मैत्रीभावनेचें विधान:-

अत्तूपमाय सब्बेसं सत्तानं सुखकामतं।
पस्सित्वा कमतो मेत्त सब्बसत्तेसु भावये।।


आपल्याप्रमाणेंच सर्व प्राणिमात्र सुखाची इच्छा करितात, असें जाणून क्रमाक्रमानें त्या सर्वाविषयी प्रेमभाव उत्पन्न करावा.

सुखी भवेय्यं निदुक्खो अहं निच्च अहं विय।
हिताच मे सुखी होन्तु मज्झत्ता चथ वेरिनो।।


सदासर्वदा मीं सुखी असावें, मी निर्दु:खी असावें, माझ्याप्रमाणें माझे मित्रहि सुखी होवोत, मध्यस्थहि सुखी हावात, आणि माझे वैरीहि सुखी होवोत।

इमम्हि गामक्खेत्तम्हि सत्ता होन्तु सुखी सदा।
ततो परं च रज्जेसु चक्कबाळेसु जतुना।।


या आसपासच्या शेतांतील आणि या गांवांतील सर्वं प्राणी सर्वकाल सुखी होवोत. या राज्यांतील प्राणी सुखी हावोत. या विश्वांतील (सर्व) प्राणी सुखी होवोत.

तैथा इत्थी पुमा चेव अरिया अनरिया पि च।
देवा नरा अपायठ्ठा तथा दशदिसासु च।।


त्याचप्रमाणें स्त्रिया आणि पुरुष, आर्य आणि अनार्यं, देव आणि मनुष्य हे सर्व सुखी होवोत. दुर्गतीप्रत गेलेले प्राणीहि सुखी होवोत. दाही दिशांला सर्व प्राणी सुखी होवोत.

या श्लोकांत क्रमाक्रमानें प्रेमभाव कसा वाढवावा, हें सांगितलें आहे. प्रथमत: स्वत:वरच प्रेम उत्पन्न करून तें आपल्या मित्रांवर, मध्यस्थांवर व तद्नंतर आपल्या शत्रूंवरहि उत्पन्न केलें पाहिजे. तसच तें पहिल्यानें आपल्या गांवच्या प्राण्यांवर उत्पन्न करून हळूहळू त्याची मर्यादा विश्वमर्यादेपर्यंत नेऊन पोंचविली पाहिजे. सगळा प्राणीसमुदाय आपल्या डोळ्यांसमोर उभा आहें कीं काय अशी कल्पना करून त्यांजवर मी मनोभावे प्रेम करीत आहें. माझें अंत:करण प्रेममय झालें आहे, मला शत्रू म्हणून कोणीच राहिला नाहीं, व्याघ्र, सिंह इत्यादि हिंस्त्र प्राणी देखील माझे मित्र झाले आहेत, सर्प माझ्या अंगावर लोळत आहेत, हा वाघ या बाजूला माझ्या मांडीवर डोकें ठेवून स्वस्थ झोंपी गेला आहे, कोणापासूनच मला भय म्हणून राहिले नाहीं, अशी भावना केली पाहिजे.

एखाद्याच्या अंत:करणामध्ये द्वेषभाव तीव्र असल्यामुळें त्याच्या शत्रूची त्याला वारंवार आठवण होते, आणि तिच्या योगें मैत्रीभावनेस जबरदस्त अडथळा येतो. अशा मनुष्यानें बुद्धोपदेशाचें आणि साधुसंतांच्या उपदेशाचें पारायण करून आपल्या मनांतील वैरभाव दूर दवडण्याचा प्रयत्न करावा. यासंबंधी ककचूपमसुत्तांत भगवान् बुद्धानें भिक्षूंस केलेला उपदेश ध्यानांत ठेवण्यासारखा आहे.