Get it on Google Play
Download on the App Store

मनाची एकाग्रता

पांडुरंग ' मनाची एकाग्रता कशी करावी ' या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?