Get it on Google Play
Download on the App Store

कारखान्यातले भूत

कोणे एके काळी भंडारा जिल्ह्यात
विड्या वळण्याचा उद्योग
भरभराटीस होता.स्वस्त आणि मुबलक
मनुष्यबळ,जंगलात
मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे
आणि विडी कारखान्याला असणारे पोषक
वातावरण, ह्यामुळे बर्याच
उद्योजकांनी बिडी कारखाने चालवले होते.
सिगारेटींचे एवढे प्रस्थ
नव्हते; गावोगावी, चौकाचौकांत विड्याच
फ़ुंकल्या जात. एकूणच
विडी कारखान्यांना भरभराट होती,
नफ्याचा उद्योग होता.
काळ बदलला. विड्या ओढणे
गावंढळपणा झाला.
सिगारेटी ओढणे 'फॅशन' म्हणवू लागली.
आता गावागावांत,
चौकाचौकांत तरुण पोरं सिगारेटी ओढत
'स्टाईल' मारु लागली .
विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत
होती.
नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे
जंगलातून तेंदूपत्ता आणणे
जिकीरीचे होऊ लागले. तेंदूपत्ता महाग
झाला.
विडी कारखान्यांना ओहोटी लागली.
गावोगावचे छोटे कारखाने बंद
पडले. मोठे कारखाने कसेबसे तग धरून होते, पण
बरेचसे नतमस्तक
झाले.
असाच एक
विडी कारखाना एका छोट्याशा गावात
टिकण्याची धडपड करत होता. पण घर फिरले
की घराचे
वासेही फिरतात. जेमतेम टिकून
असलेल्या या कारखान्याला एके
दिवशी आगीने कवेत घेतले.( गावात
अजूनही लोक कुजबुजतात की,
आग मालकानेच
लावली आणि विम्याची रक्कम खिशात
घातली. )
कारखाना सार्या मुद्देमालासकट भस्मसात
झाला.
मातीच्या भिंती आणि वरचे कौलारू छप्पर
तेवढे टिकून राहिले. आग
विझवण्याच्या प्रयत्नात दोन कामगार
मात्र बळी पडले.
कारखान्याच्या कंपाउंडबाहेर
कामगारांसाठी मालकाने २०-२१
घरांची एक वसाहत बनवली होती.
कारखाना बंद झाल्यावर ती कुटुंबं
नव्या रोजगाराच्या शोधात इतरत्र
पांगली. मालकाने चाळ भाड्याने
चढवली. गावात बदली होऊन
येणार्या नोकरदार वर्गासाठी ती चाळ
सोयीची होती.
कारखान्याच्या भव्य
लोखंडी फाटकाला मोठे कुलुप चढवून
आणि गावातला आपला बंगला विकून मालक
शहरात रहायला गेला.
वर्षामागून वर्षे गेली.
जळक्या भिंती आणि फुटक्या कौलांचे
छप्पर घेऊन कारखाना एकाकी उभा होता.
आवारातल्या सुंदर बागेचे
रुपांतर रानात झाले. लोखंडी फाटकाला गंज
चढला.
चाळीला कारखान्यापासून
वेगळी करणारी कंपाउंड मोडकळीस आली.
अशा इमारतींसोबत
भुतांच्या गोष्टी जोडल्या गेल्या नाहीत
तरच
नवल. आगीत बळी गेलेल्या त्या दोन
कामगारांचा भूत म्हणून
पुनर्जन्म झाला होता. कारखान्यासोबत
अनेक
भूतकथा जोडल्या गेल्या. चाळीत एखादे नवे
कुटुंब रहायला आले की ,
त्यांना ह्या कथा सांगून खबरदार केले जाई.
मुलाने जास्त
मस्ती केली की,
त्याला कारखान्यातल्या भुतांचे भय दाखवले
जाई. '
अभ्यास कर नाहीतर कारखान्यात नेऊन
सोडेन'
म्हणण्याचा अवकाश , मुलगा लगेच
अभ्यासाला बसे !
एके दिवशी चाळीत नवे कुटुंब रहायला आले.
नवरा-
बायको आणि दोन मुले असे छोटेखानी कुटुंब
होते.
घरप्रमुखाची बॅंकेची फिरतीची नोकरी, २-३
वर्षांत बदली व्हायची.
शेजारी आले, विचारपूस केली,
गावाबद्दलची माहिती दिली आणि शेजारधर्म
पाळत
कारखान्याचीही सविस्तर
माहिती दिली.
हळूहळु ते कुटुंब चाळीत, गावात चांगलेच रुळले.
जवळच
असलेल्या शाळेत मुले जाऊ लागली. शेंडेफळ
थोडे उनाड होते. त्याचे
नाव पंकज,एकदा तो कंपाउंडवरून उडी मारून
कारखान्यात
जाण्याचा प्रयत्न करू लागला. आईने पाहिले
आणि त्याला ओढतच
परत आणले. अर्थात
उनाडक्या करणार्या मुलाला वठणीवर कसे
आणायचे हे सर्वच आयांना ठाऊक असते. आईने
त्याला तिखट-मीठ
लावून
कारखान्यातल्या भुतांच्या गोष्टी सांगितल्या.
खरे तर
तिचा भुतांवर विश्वास नव्हता, पण ह्याने
पुन्हा पुन्हा कारखान्याकडे
जाऊ नये हा त्यामागचा हेतू होता. बर्याच
वर्षांपासून बंद
असलेल्या कारखान्यात साप-
विंचवांचा धोका होता. रान माजले होते.
अशा जागी ती माउली आपल्या लेकराला कसे
जाऊ देईल ?
पंकजने आईवर विश्वास ठेवला. मनात
कुठेतरी भूत घर
करून बसले. आता संध्याकाळी संधीप्रकाशात,
रातकिड्यांच्या किर्र-
किर्र आवाजात कारखान्याकडे लक्ष गेले की,
त्याच्या उरात
धडकी भरायची. कंपाउंडवरून
उडी मारण्याचा विचार मन
त्याच्या स्वप्नातही आला नाही.
वर्गात पंकजचा एक चांगला मित्र
बनला होता, अमोल.
अमोल चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता.
दोघांची चांगलीच
गट्टी जमली. दोघे एकाच बाकावर बसायचे,
एकत्र डबे खायचे
आणि खेळायचे.
शाळेमागे थोडे अंतर चालत गेले की शेतातून
तळ्याकडे
जाणारी एक पायवाट होती. तिथे एक मोठे
चिंचेचे झाड होते. दूर
कारखान्याची मागची बाजू दिसायची.
लांबच लांब काळपट लाल भिंत
आणि थोड्या-थोड्या अंतराने
असलेल्या लोखंडी गजाच्या मोठ्या खिडक्या.
बरेचदा दोघेही सुटीत
त्या झाडाखाली येऊन बसत. हे त्या दोघांचे
छोटेसे विश्व होते.
निवांत बसून गप्पा मारायची जागा होती.
इथे वर्गातला,
पटांगणावरचा गोंधळ नव्ह्ता.
होता तो पक्ष्यांचा मंजुळ
ध्वनी आणि कुठुनतरी येणारा बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिण
स्वर. वेगवेगळ्या विषयांवर
गप्पा मारायची ती हक्काची जागा होती.
त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत
चिंचेखाली बसले होते.
अचानक त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज
बोलला,
" तुले का वाटते बे, अम्या, कारखान्यात भूत
असल ? "
" ह्या ss !! काहीच का बे ! आपन
अश्या फाल्तू गोष्टीवर
विश्वास नाही ठेवत. "
" अबे, पर सबच जन तं म्हनतंत ? "
" सबच जन म्हनतत म्हनून का झाला,
खरा थोडीच असल . मले
भुतावर विश्वास नाही. दिसला तं मानीन.
आमच्या बाजूच्या घरात
अमरभाऊ रायते. तो सांगते का,
तो कारखान्यात गेल्ता तं त्याले भूत
नाही दिसला. तो म्हन्ते का भूत नाय आहे .
आपला भरोसा आहे
त्याच्यावर. एकदम डेरिंगबाज मानूस आहे तो. "
" हव ? "
" नाइ तं का. खोटा थोडीच सांगून रायलो.
आता मले सांग, लोक
म्हन्तेत का चिचेच्या झाडावर देवाल रायते.
आता आपन तं रोजच
या झाडाखाली बसतो का नाही ?
कधी कधी सायंकाळी सात
वाजेवरी बसून रायलो, पर तुले दिसली आहे ?
कधी का आपल्या आंगावर चढली ? नाही नं ?
असती तं
दिसली नसती का ? " अमोल विजयी मुद्रेत
पंकजकडे पाहत बोलला.
पंकजला उगीच ओशाळल्यासारखे झाले.
ह्या वयात
मुलांची मानस्थिक स्थिती विचित्र असते.
एखादा मित्र आपण जे करू
शकत नाही ते करत आहे म्हणजे काहीतरी अचाट
पराक्रम करत आहे
असे वाटत असते. घरची बंधने
आणि आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचे
आकर्षण अशा कात्रीच
तो सापडतो. मित्रासमोर
आपली प्रतिमा भागुबाईची होऊ नये असे
त्यांना वाटत असते. मग
तो मनातली भीती लपवतो, सारवासारव
करण्याचा प्रयत्न करतो. आपण अगदीच
बावळट
नाही हे
दाखवण्याची धडपड सुरू होते. पंकजने तेच केले.
" आपन बी भुताले काही भेवत नाही, पर
विश्वास ठेवाले
का जाते ? जगात चांगला आहे तं वाईट
बी असलच . देव आहे तं भूत
बी असलच ! "
" तू ठेव विश्वास, आपन नाही ठेवत. "
" अनं तुले का वाटते,
त्या कारखान्यातल्या विहीरीत
पाह्यला तं
मानूस साप बन्ते अनं तिच्यात पडते,
खरा असल ? "
" तुले कोनं सागंलन ? "
" नाही.....असाच इखनाल-तिखनाल
ऐकलाओ... "
खरे तर त्याला ही गोष्ट त्याच्या आईनेच
सांगितली होती, पण
अजूनही आपण आईने सांगितलेल्या गोष्टींवर
पटकन विश्वास ठेवतो ,
हे अमोलसमोर स्वीकार
करायची त्याला लाज वाटली.
तो पुन्हा आपले
हसे उडवेल अशी भीती होतीच.
" ते सब झूट आहे बे पक्या . असा कधी होऊ
शकते
का ?
वाटल्यास तूच त्या विहीरीत डोकावून
पाह्य. "
खरे तर तेव्हा पंकज " नाही भाऊ, मी कायले
रिस्क घेऊ ? "
म्हणणार होता , पण स्वतःला सावरून
तो म्हणाला, " हव बे, जाऊन
पाहावा लागल एखाद-दिवशी. "
" अबे, उद्याच जाउन जा. "
" हव."
घंटा झाली. दोघे उठले आणि वर्गाकडे
जायला निघाले. वर्गात
पंकजच्या डोक्यात तोच विषय घॊळत
होता आणि शाळा सुटल्यावर
घरी जातांनाही त्याच्या डोक्यातून
कारखान्यातले भूत काही जात
नव्हते.
रात्री झोपतांना पडल्यापडल्या त्याने
विचार
केला की एकदा खरंच कारखान्यात
जायला हवे. भूत खरंच आहे
की नाही बघायला हवे. त्याचे विचारचक्र
सुरू झाले,
" मी जाईन, पूरा कारखाना फ़िरीन. भूत आहे
का नाही पाहून येईन.
पर विहीरीत नाही पाहीन.
समजा विहीरीत पाह्यलो अनं साप होऊन
विहीरीत पडलो तं ? बाहेर कसा येईन ? बाहेर
आल्यावर आईले
का सांगीन ? पर सापाच्या रुपात आई मले
ओळखल का ? अनं बाहेर
येताच नाही आला तं ? मंग तं आई परेशान
होऊन जाईल. अनं
मी साप बनून का करीन ? शाळेत
कसा जाईन ? छी... भेपका अनं
उंदरं खावा लागल. यक्क थू ! नाही, आपन
विहीरीत नाही पाहावाचा.
पर कारखान्यात जाईन. भूत दिसलाच तं
त्याले 'अगा मामा,
अगा दादा ' करून पटवीन म्हंजे तो मले सोडून
टाकल.
काही नाही करल. उद्याच जाऊ का ? हव,
उद्याच जातो.. नाही,
नाही... उद्या नाही, मंग कई आरामात
जाईन." असा सगळा विचार
करत त्याला कधी झोप लागली हे कळलेच
नाही.
दुसर्या दिवशी वर्गात अमोलने
त्याला विचारलेच, "
का पक्या ? का म्हनतेस ? जाशील का बे
कारखान्यात ? "
" हव जाईन नं बे. कावून नाही जाईन ?
मी घाबरतो थोडीच !
"
आता जायचे तरा ठरवले आहे, तसे
अमोलला सांगितले पण, पण
जायचे कधी हा प्रश्न पंकजच्या मनात होता.
पुढचे एक-दोन दिवस
अमोल त्याला 'कधी ?'
विचारायला आणि हा 'लवकरच' असे उत्तर
द्यायचा. हळूहळू गप्पांमध्ये नवे विषय आले
आणि हा विषय मागे
पडला. पण कारखाना तर रोजच
पंकजच्या नजरेस पडायचा. त्यामुळे
हा विषय त्याच्या डोक्यातून तरी जात
नव्हता. ' कधीतरी आपन
कारखान्यात जाउन पाहायचे' अशी त्याने
मनाशी खूणगाठ
बांधली असली तरी तो दिवस काही उजाडत
नव्हता.
त्यांच्या ह्या चर्चेला सुद्धा आता वर्ष होत
आले होते. एके
दिवस
त्याच्या आईला सामानाची आवराआवर
करतांना पाहिले. हे
दृश्य त्याच्या ओळखीचे होते.
बाबांची पुन्हा बदली झाल्याचे
त्याच्या लक्षात आले, त्याने आईने
विचारता उत्तर आले
की या रविवारी निघायचे आहे.
त्याला कारखान्यातल्य़ा भूताबद्दल
केलेला निश्चय आठवला. म्हणजे
त्याच्या हाती फक्त ४ दिवस होते.
मनाचा हिय्या करून कारखान्यात
भूताच्या शोधात जायचे
आणि ह्या प्रकरणाचा निकाल
लावायचा असे त्याने ठरवले.
मनाची तयारी करण्यातच पुढचे दोन दिवस
गेले.
शुक्रवारी शाळेत जाताना शाळेतून परतून
कारखान्यात जायचे असे
त्याने ठरवले. मात्र त्य़ाने ही गोष्ट अजून
अमोलला सांगितली नव्ह्ती. आपण अजूनपर्यंत
कारखान्यात
गेलेलो नाहीहे त्याला कळले तर
तो आपली उडवेल, असे
त्याला वाटले. त्यापेक्षा उद्या शाळेत आपण
सांगायचे असा त्याने
विचार केला.
शुक्रवारी शाळेतून तो लगबगीने परतला.
हिवाळ्याचे दिवस
होते. अंधार लवकर पडतो तेव्हा घाई करणे
गरजेचे
होते. त्याने कपडे
बदलले आणि आईचे लक्ष नाही हे बघून
तो कंपाऊंडकडे गेला.
विटांच्या भिंतीत असलेल्या खाचांमध्ये
पाय रोवत तो भिंतीवर चढला.
भिंतीवरून त्याने कारखान्यावर नजर
फ़िरवली. हिवाळ्याचे दिवस,
संध्य़ाकाळचे पाच वाजले असावेत. प्रकाश
मंदावला होता.
बागेतली बेछूट वाढलेली झाडे, तण , झुडूप
आणि तो पडका कारखाना.
सारेच दृश्य मनात भीती निर्माण करणारे
होते. तो भिंतीवरून
खाली उडी मारणार तेवढ्यात त्याचे लक्ष
झाडीत
दडलेल्या विहीरीकडे गेले
आणि काळजाचा ठोका चुकला. पण
आता माघार घ्यायची नाही असे त्याने
ठरवले होते. "जय बजंरग
बली, तोड़ दे दुश्मन की नली " म्हणत त्याने
भिंतीवरून उडी मारली.
मनात " भूत पिशाच निकट नहीं आवें...." सुरू
झाले होते
आणि तो सगळीकडे भिरभिरती नजर ठेवत एक-
एक पाऊल टाकत
होता. अचानक चर्र.. असा आवाज
झाला आणि त्याने भिंतीकडे धूम
ठोकली. पण, भिंतीवर चढतांना त्याने मागे
वळून पाहिले,
तेव्हा त्याच्या लक्षात आले
की तो पाचोळ्यावर पाय
पडल्याचा आवाज होता. " ह्या ss आपन
बिनफ़ुकट घाबरलो,
"त्याने मनात म्हटले. तो परत
वळला आणि आता सरळ
कारखान्याकडे जाऊ लागला. पण वारंवार
त्याचे लक्ष
त्या विहीरीकडे जात होते. कोण जाणे, पण
त्या विहीरीत एक
विचित्र आकर्षण होते. पण आपण विहीरीत
डोकावलो तर विहीर
आपल्याला साप बनवून आत ओढेल आणि साप
बनलो तर मग आई
काय म्हणेल हा विचार त्याच्या डोक्यात
यायचा आणि तो विहीरीकडे जाणे
टाळायचा.
आता तो कारखान्याच्या अगदी समोर
उभा होता.
त्याच्या डोळ्यासमोर पोपडे
उडालेल्या जळक्या काळपट
भिंती होत्या. सगळीकडे
कोळ्याच्या जाळ्यांचे साम्राज्य होते
आणि खाली फ़रशी पाल्यापाचोळ्याने
झाकली गेली होती.
तो कारखान्यात शिरला.
दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या खोल्या होत्या.
तो त्या खोल्यांत
शिरला. फ़ुटक्या कौलांतून प्रकाश अंधार दूर
सारत होता.
तो एकेका खोलीत जाऊन फ़ेरी मारून
यायचा. अजून त्याला भूत दिसले
नव्हते. आता त्याची भीती बरीच
कमी झाली. तो शेवटच्या खोलीत
शिरला.लांबच लांब खोली होती. थोड्या-
थॊड्या अंतरावर
लोखंडी गजांच्या अनेक
मोठ्या खिडक्या होत्या. हे कदाचित
गोदाम
असावे, असा त्याने अंदाज
बांधला आणि तो खरादेखील होता. ते
गोदाम होते. चिंचेच्या झाडाखालून
आपल्याला हीच खोली दिसले
हेदेखील त्याच्या लक्षात आले. त्याने चौफ़ेर
नजर फ़िरवली.
खाली फ़ुटक्या कौलांचा खच होता,
पालापाचोळा, कोळीष्टके होतीच.
तो खिडकीबाहेरून कसे दृश्य दिसते हे
बघायला खिडकीपाशी गेला.चिंचेच्या झाडाखाली त्याला एक
आकृती दिसली. अंधूक प्रकाशात चेहरा नीट
दिसत नसला कपड्यांवरून
आणि एकंदर शरीरयष्टीवरून हा अमोलच
असल्याचे त्याच्या लक्षात
आले. अमोल कधीकधी शाळा सुटल्यावरदेखील
चिंचेच्याझाडाखाली बसून चिंतन का मनन,
अमोलच्याच भाषेत, "
विचार करतो विश्वाचा" वगैरे अलाना-
फलाना करत असतो हे
त्याला माहीत होते.
अचानक पंकजच्या मनात एक विचार आला.
"समजा आपन अमोलले
उद्या सांगितला की कारखान्यात जाऊन
आलो तरी त्याचा विश्वास
बसन्याची शक्यता कमीच राह्यल. आज
तो आपल्या डोळ्यानं पाह्यल तं
त्याचा विश्वास पन बसून जायल.
"
आणि तो खिडकीपाशी जाऊन
अमोलला हातवारे करू लागला.
मोठ्याने हाका मारू लागला. पण अमोलचे
काही लक्ष जाईना.
एव्हाना अंधारू लागले होते. कदाचित ह्यामुळे
असेल, असे वाटून
तो अधिकच मोठमोठ्याने हातवारे करू
लागला. खिडकीतून हात बाहेर
करून आपल्याकडे बोलवू लागला. पण अमोल
खाली मान घालून
कुठल्या विश्वात गुंग झाला होता देव जाणे.
तो जणू तिथेच
थिजला होता, काहीच प्रतिसाद देत
नव्हता. शेवटी कंटाळून पंकजने
तो प्रयत्न सोडला आणि खिडकीतून परत
वळला. मग त्याने उग्गाच
खेळ म्हणून खोलीच्या ह्या टोकापासून
त्या टोकापर्यंत उड्या मारत
धाव घेतली. मग पुन्हा एकदा प्रयत्न
करावा म्हणून
खिडकीपाशी गेला तर अमोल तिथे नव्ह्ता.
तो घरी परतला असावा.
इकडे कारखान्यात पंकजची भिड
पुरती चेपली होती.
तो आता कारखान्यात " अगा भूत भाऊ, भूत
काका, भूत मामा,
सामोर ये गा .." असे मोठ्याने ओरडत हिंडत
होता.
तो आता कारखान्यातून बाहेर पडला.त्याचे
लक्ष पुन्हा विहीरीकडे
गेले.
" आता भुताची कहानी खोटी आहे म्हंजे
सापाची पन खोटीच असल..
" त्याने विचार केला.
तो हळूहळु विहीरीकडे जाऊ लागला. पण
त्याच्या डोक्यात
पुन्हा विचार आला,
" अनं सापाची गोष्ट खरी राह्यली तं ? मंग त
मी साप बनून जाईन.
मग आई का म्हनल ? भुताले तं पटवता पन येउन
जायल, पर
सापाचा मानूस कसा बनीन ? "
आणि तो परत विहीपासून दूर झाला.
" कारखान्यात भूत नाही आहे इतका माहीत
झाला तोच बहोत आहे,
आता जास्ती मस्ती नाही करावले पाइजे , "
असा विचार करत
तो कंपाउंडपाशी आला आणि भिंतीवर
चढला.
एव्हाना चांगलेच अंधारले होते, पण
तो आता अंधाराला घाबरत
नव्हता. त्याने पुन्हा एकदा कारखान्यावर
नजर
फ़िरवली आणि अगदी आनंदाने
खाली उतरला.
घराकडे परत जातांना त्याला खूप हलके वाटत
होते. एक ओझे
उतरले होते. कारखान्यात भूत नाही हे
त्याला कळले होते.
उद्या अमोलला हे सारे सांगायचे हे ठरवले. आज
त्याला अतिशय
शांत झोप आली.
दुसर्या दिवशी शनिवार, सकाळची शाळा,
पण पंकजला जाग
आली नाही. आईनेही त्याला धपाटे घालून
उठवले नाही. जेव्हा जाग
आली , तेव्हा सकाळचे १० वाजले होते.
त्याची शाळा सुटली होती.
त्याने आईला विचारले तर तिने सांगितले की,
आपण आजच जात
आहोत. म्हणून तुला उठवले नाही. काल अचानक
जाण्याचा दिवस
बदलला. तुझ्या शाळेचे सगळे काम झालेच आहे.
तिने त्याला पटकन
आवरून तयार व्हायला सांगितले.
तो अमोलला भेटू शकत नव्हता.
भूत नाही हे त्याचे म्हणणे पटले आहे हे सांगू
शकत
नव्हता. अमोलने
त्याच्या जीवनात किती मोठे स्थान बनवले
आहे हे सांगू शकत
नव्हता. आणि शेवटचे
चिंचेच्या झाडाखाली बसून पोटभर गप्पा करू
शकतनव्हता. एक गळाभेट पण घ्यायची होती.
" आई, मी शाळेत जाऊन येऊ ५ मिन्टं ? "
त्याने
विचारले.
" अरे , आता कसा जाशील ? वर्ग चालू
असतील
आणि आपली सगळी तयारी झाली आहे.
गाडी बाहेर वाट बघत आहे.
आवर पटकन."
उगाच त्याच्या मनावर मळभ दाटले. गाडीत
बसून जातांना इथली ३
वर्षें डोळ्यांसमोर येऊ लागली;
आणि कारखान्यातले चित्र तर
वारंवार डोळ्यांपुढे यायचे. कालचा दिवस
त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस
होता. मनातल्या मनात
तो म्हणाला,
" अम्या, दोस्ता, तू सही होतास.
आपला आता बिल्कुल विश्वास
बसला आहे. भूत नावाची गोष्ट या जगात
रायतच नाही...... "
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\
आज अमोल शाळेत अंमळ लवकरच आला. वर्गात
त्याची नजर
भिरभिरली. मग तो आपल्या जागी जाऊन
बसला. पण
त्याची सारखी चुळबुळ सुरु होती.
प्रार्थना संपली, वर्ग सुरु झाले
तरी त्याच्या बाजूची जागा रिकामीच
होती. पंकज आला नव्हता.
त्याने पंकजच्याच चाळीत
राहणार्या मित्राला विचारले, त्याने
सांगितले की , ते लोक आजच जाणार होते, गेले
असतील.
" पन तो तं उद्या जानार होता ? "
" हव, पन काल रात्री त्याची आई
माझ्या आईले भेटाले
आली होती तं माहीत झाला का ते आजच
चाल्ले म्हनून. "
" हट बे यार... त्याले एक मोठी गोष्ट
सांगावाची होती बे..
कालचा दिवस जबरदस्त होता बे..
पक्या, दोस्ता, तू सही होतास,
आपला आता बिल्कुल विश्वास
बसला आहे...