Get it on Google Play
Download on the App Store

श्रीहरितालिकेची कहाणी

एके दिवशीं ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसलीं होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतांत चांगलं ब्रत कोणतं? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एकादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरीं पडालें हेंही मला सांगा.” तेव्हां शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णु श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ देवांत विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हें व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे तें तुला सांगतों. तेंच तूं पूर्वजन्मीं हिमालय पर्वतावर केलंस, आणि त्याच पुण्यानं तूं मला प्राप्त झालीस तें ऐक.

हें व्रत भाद्रप्रद महिन्यांतला पहिल्या तृतीयेला कराव. तें पूर्वी तूं केलंस तें मी तुला आतां सांगतों. तूं लहानपणीं मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाचीं पिललेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हीं तिन्ही दुःख सहन केलींस. हे तुझे श्रम पाहुन तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अशी कन्या कोणास द्यावी? अशी त्याला चिंता पडाली.

इतक्यांत तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हां नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनींच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलों आहे.” हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.

नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाहीं. तूं रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हां तूं सांगितलंस, महादेवावांचून मला दुसरा पती करणे नाही; असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा?

मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यांत नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेंत जाऊन तूं उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्रीं जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मि तिथं आलों. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तूं म्हणालीस,“तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाहीं,”

नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालों. पुढं दुसर्‍या दिवशीं ती व्रतपूजा तूं विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यांत तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तूं सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग कांही दिवसांनीं चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

“ज्या ठिकाणीं हें व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून तें स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावें त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्रीं जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहींस होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशीं बायकांनीं जर कांहीं खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवसीं उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, देवाब्राह्मणाचे द्वारीं, गाईचे गोठीं, पिपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

व्रतांच्या कथा

संकलित
Chapters
गणपतीची कहाणी महालक्ष्मीची कहाणी श्रीविष्णूची कहाणी नागपंचमीची शेतकर्‍याची कहाणी नागपंचमीची कहाणी सोमवारची शिवामुठीची कहाणी सोमवारची खुलभर दुधाची कहाणी सोळा सोमवाराची कहाणी सोमवारची फसकीची कहाणी सोमवतीची कहाणी सोमवारची साधी कहाणी मंगळागौरीची कहाणी शुक्रवारची कहाणी शुक्रवाराची जिवतीची कहाणी शनिवारची मारुतीची कहाणी संपत शनिवारची कहाणी आदित्यराणूबाईची कहाणी बोडणाची कहाणी वसूबारसेची कहाणी ललितापंचमीची कहाणी श्रीहरितालिकेची कहाणी ज्येष्ठागौरीची कहाणी ऋषिपंचमीची कहाणी पिठोरीची कहाणी दिव्यांच्या अंवसेची कहाणी धरित्रीची कहाणी गोपद्मांची कहाणी पांचा देवांची कहाणी वर्णसठीची कहाणी बुध-बृहस्पतींची कहाणी शिळासप्तमीची कहाणी