Get it on Google Play
Download on the App Store

विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर

विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर

अद्वितीय कलागुणांसह तमाशा या लोककलेला चौफुल्यापासून ते राजदरबारापर्यंत प्रतिष्ठा प्राप्त करून देणार्‍या तमाशा सम्राज्ञी!

 

भाऊ बापू (मांग) नारायण गावकरांचा तमाशा महाराष्ट्र गाजवत होता तेव्हाचा काळ! सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या गावी  भाऊ खुडेंची बायको शांताबाई गरोदर होती. त्या दिवशी तमाशाचा मुक्काम पंढरपूरला होता. ती आषाढी एकादशीची रात्र होती. रात्री भाऊंच्या तमाशाचा  फड उभा राहिला आणि इकडे शांताबाईंच्या वेणा वाढू लागल्या. मध्यरात्रीच्या सुमारास शांताबाईंनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.  पंढरपूरच्या विठोबाच्या छायेत मुलगी झाली म्हणून भाऊ आणि शांताबाईंनी तिचं नाव विठा ठेवलं.पण तमाशाच्या फडाला आणि पहाटेच्या सूर्याला साक्षी ठेवून जन्माला येऊन विठानं जणू नेमकी वेळ साधली. कारण विठा नामक हे नक्षत्र पुढे तमाशा विश्वावर तेजाने तळपलं. भाऊ खुडेच्या या लेकीनं पुढं महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्‍तातापर्यंत नेलं.

विठाबाईंचे वडील भाऊ खुडे आणि चुलत भाऊ बापू खुडे यांचा भाऊ-बापू (मांग) नारायणगावकर हा तमाशा अस्सल लोककलेचा नमुना तर होताच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तमाशा हे या कलावंतांसाठी समाज सुधारणेचं एक माध्यम होतं. लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदीक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये  विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी  शिक्षणाची सक्ती  केली नाही आणि वयाच्या चौथ्या - पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली. आता त्या आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती करू लागल्या. याच सुमारस मामा वरेरकर - आळतेकर आपल्या कलापथकातून एकांकिका आणि पथनाट्याच्या माध्यमातून समाजजागृती करत होते. भाऊ-बापूचा तमाशा पाहून ते खूपच प्रभावित झाले. भाऊ आणि बापू तमाशातून त्यांच्यासारखेच समाजप्रबोधन करत होते. त्यामुळे मामा वरेरकरांचा आणि भाऊ - बापूंचा विशेष स्नेह जुळला.

भाऊ-बापूच्या तमाशात आता अधून-मधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवून जात होत्या.  ही कला मामा वरेरकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. भाऊंनी ती तात्काळ मान्य केली आणि विठाबाई  मामा वरेरकरांच्या कलापथकातून काम करू लागल्या. त्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या आणि शिकण्याच्या कक्षा रुंदावल्या. देशाविषयी, समाजाविषयी एक भूमिका तयार झाली. तमाशात आत्मसात केलेल्या कलेला आणखी पैलू पडले. त्यात शास्त्रशुद्धपणा आला. आपल्या कलेत त्या आणखी निपुण झाल्या.

याच दरम्यान भाऊ-बापूंचा तमाशा कोळे या गावी मुक्कामाला होता. तिथं भाऊ अकेलकर यांनीही  आपल्या तमाशाचा फड उभारला होता. दोन्ही फडांनी एकमेकांना आव्हान दिलं आणि त्या रात्री दोघांमध्ये `भेदीक' सुरू झाली. सवाल-जबाब सुरू झाले. कुणीच कुणीच कुणाला हार जात नव्हतं. पण अकेलकरांच्या नुकत्याच वयात आलेल्या मुलीने ‘अशी कोणती रूपाची खाण तुझ्या गाठीला आहे’, असा सवाल करत बापूंना निरुत्तर केलं. भाऊंना ही हार जिव्हारी लागली.  या पराभवानं विठाबाईही  पेटून उठल्या आणि लागलीच बाडबिस्तारा आवरून कराडच्या वाटेला लागल्या.

त्या रात्री पुन्हा एकदा दोन्ही तमाशात भेदीक जुंपली आणि ती जुगलबंदी जिंकून विठाबाईंनी आपल्या वडिलांना हरविल्याचा पुरेपूर बदला घेतला. त्या रात्री विठाबाईंचं बोर्डावर पाय ठेवणं ऐतिहासिक होतं. ती त्यांच्या  पुढच्या देदिप्यमान प्रवासाची नांदी होती. त्या वेळी विठाबाई  फक्त तेरा वर्षांच्या होत्या.

दिवस जात होते तशी विठाबाईंची कला रसिकांना भुरळ घालत होती.  नृत्यात आणि गायनात त्या खूप सरस होत्या. गवळणी, लावण्या, मराठी-हिंदी चित्रपटातली गीतं सुरेल आवाजात म्हणत असत. ढोलकीच्या तालावर नाचणार्‍या विठाबाईंना पाहणं हा एक अपूर्व आनंद असे. त्यांच्यामुळे  तमाशाला एक वेगळंच वलय प्राप्त होत होतं.

तमाशातल्या कलावंतीणीचं आयुष्यही विठाबाईंच्या हळू-हळू अंगवळणी पडत होतं. तमाशातल्या बायकांची लग्न होत नाहीत हे त्यांना ठाऊक होतं.

 

तमाशातल्या कलावंतांचं आयुष्यच खूप निराळं! बहुतेक पुरुष त्यांचं लग्न झालेलं असूनही त्यांच्या बायका-पोरांना गावी ठेवून तमाशातल्याच एखाद्या कलावंतीणीशी संधान बांधत. ती कलावंतीण जराशी थकली किंवा तिच्याशी बिनसलं की, ते तिला सोडून देत आणि दुसर्‍या कलावंतीणीबरोबर घरोबा सुरू करत. ती कलावंतीण मग दुसरा आधार शोधत असे. त्यांच्या संबंधातून जन्माला आलेली संतती फडावरच लहानाची मोठी होत असे. शाळेचं शिक्षण या मुलांपासून कोसो दूर असे. ही मुलं जरा कळती झाली की, फडावरच जुजबी कामं करत. फडावरच्या स्वैर वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असे. मुलींची अवस्था फारच वाईट असे. विठाबाईंनी याही परिस्थितीचा समर्थपणे सामना केला.

तमाशाचा फड  विठाबाईनं पुरता काबीज केला. लोक निखळ विठाबाईंचा नाच पाहायला आणि त्यांचं गाणं ऐकायला येत असत. भाऊ-बापूंचा तमाशा आता नावापुरता त्यांचा उरला होता. गण, गवळण झाली की विठाबाई बोर्डावर यायच्या. त्यांनी बोर्डावर पाय ठेवला की, शिट्‌ट्या आणि टाळ्यांचा कल्लोळ व्हायचा. मग रसिकांकडून फर्माईशी सुरू व्हायच्या. विठाबाईंच्या पायातल्या घुंगरांनी,  अंगातल्या चैतन्यानं, प्रत्येक अदेनं रसिकांना घायाळ केलं होतं.

भाऊ-बापूच्या तमाशातली गवळण, बतावणी, वगाचं सादरीकरण सगळंच अलातून असे. या वगांचे विषयही ‘शिवप्रतापासारखे’ ऐतिहासिक, ‘सत्यवान सावित्री’ सारखे धार्मिक तर कधी ‘चंद्र-मोहन’ किंवा ‘मेवाडचा कोळी’ सारखे सामाजिक असत. त्यामुळे तमाशाला येणारा प्रेक्षकवर्ग अगदी शहरातल्या बुद्धिजीवीपासून खेड्यातील अडाणी माणसापर्यंत सर्व थरातला असे. साहित्याची आणि लोककलेची आवड असणार्‍या बहुतेकांनी भाऊ-बापूंचा तमाशा पाहिला होता. संगीत नाटक अकादमीच्या समितीवर असणार्‍या काही ज्येष्ठ कलावंतांनीही हा तमाशा पाहिला होता. त्यांनी भाऊ-बापूंच्या तमाशाची समितीकडे शिफारस केली. हा तमाशा कलेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचा कसा प्रचार करतो याची माहिती दिली. त्यांच्या या शिफारसीमुळेच भाऊ-बापूंच्या तमाशाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. या वेळीही विठाबाई कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरल्या. दिल्लीकरांकडून शाबसकी मिळवूनच त्या घरी परतल्या. लवकरच नाटक अकादमीच्या परीक्षक मंडळानं पुरस्कारासाठी भाऊ-बापूंच्या तमाशाची निवड केली आणि तमाशा क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारा तो पहिला तमाशा ठरला.

सरकार दरबारी असं कौतुक झाल्यावर मग विठाबाईंनी  मागं वळून पाहिलं नाही. तमाशातले त्यांचे स्पर्धक आता खूप मागं पडले होते. तमाशा म्हणजे विठाबाई असं समीकरण रूढ झालं होतं.  आपला जन्म केवळ कलेची सेवा करण्यासाठी झालाय अशीच त्यांची धारणा होती. याबाबतीत एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. या प्रसंगातून त्यांची आपल्या कलेकडं बघण्याची दृष्टी आणि तिच्यासाठी काहीही करण्याची पराकोटीची भावना दिसून येते.

   

१९६७ साली तमाशाचा मुक्काम शिखर शिंगणापूरला होता विठाबाई त्या वेळी गरोदर होत्या. दिवस भरत आले होते. पण विठाबाईंना उसंत नव्हती. अशाच अवस्थेत त्यांनी पायात चाळ बांधले आणि बोर्डावर आल्या. गवळणींबरोबर बेभान होऊन नाचल्या. पण बतावणी सुरू झाली आणि कळा असह्य झाल्याने विठाबाई ताबडतोब आपल्या राहुटीत आल्या. आता बाळंतवेणा सुरू झाल्या. तमाशा पाहायला आलेल्या एका म्हातारीनं आपलं दाईपण व्यवस्थित निभावलं आणि विठाबाईंना मोकळं केलं. त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. पण लोकांना वगनाट्याचा पुढचा भाग पाहायचा होता. विठाबाईंचं काम पाहायचं होतं. राहुटीत पडल्या-पडल्या विठाबाईंच्या कानावर हा गोंधळ गेला. `पब्लिक' ऐकत नाही हे पाहताच त्या उठल्या, चाळ पुन्हा पायात बांधले आणि पुन्हा बोर्डावर पाय ठेवला. आता आश्चर्य करण्याची वेळ रसिकांची होती. विठाबाईंनी रसिकांची इच्छा पूर्ण केली, कलेवरची अपार निष्ठा व्यक्त केली.

 

विठाबाईंची आपल्या कलेवरची निष्ठा ही अशी होती. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी अनेक माणसं जोडली. काही त्यांच्या वडिलांच्या काळापासून होती. त्यांच्या मदतीनं त्यांनी अनेक ठिकाणी आपली कला नेली. १९६२ मध्ये विठाबाईंच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. विठाबाई आणि त्यांच्या सहकार्‍यांना लष्करातील जवानांची करमणूक करण्यासाठी नेफा सीमेवर जाण्याचं आमंत्रण मिळालं. विठाबाईंच्या कलेचा हा एक प्रकारे सन्मान होता. खरं तर त्या वेळी विठाबाईंची लेक मालती अवघी तीन महिन्यांची होती. पण आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानून त्यांनी मुलांना घरच्यांच्या हवाली केलं आणि आपल्या फडाबरोबर नेफा सीमेवर गेल्या. सीमेवरच्या बर्फाळ आणि जंगलाच्या प्रदेशात त्या आनंदानं राहिल्या. रोज एका छावणीवरून दुसर्‍या छावणीवर जाणं, तिथे कला सादर करणं हे कष्टप्रद होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काळात त्यांना विश्रांतीची गरज होती, त्याच काळात  ही दगदग त्या सोशीत होत्या.

कालांतराने विठाबाईंच्या वडिलांचं-भाऊ खुडेंचं-आणि चुलत भाऊ बापू खुडेंचं निधन झाल्यावर तमाशाची सगळी सूत्रं त्यांचा दुसरा चुलत भाऊ सावळाराम यानं हाती घेतली. पण त्याच्या काळात फडात हेवेदावे सुरू झाले. आर्थिक स्थितीही ढासळली. विठाबाई आणि सावळाराम यांच्यात वितुष्ट आलं. याचा परिणाम एवढाच झाला की, विठाबाई आपल्या मुलींसोबत भाऊ-बापूंच्या तमाशातून बाहेर पडल्या आणि त्यांनी विठा-भाऊ (मांग) नारायणगावकर असा स्वतंत्र फड सुरू केला. त्यांच्या तमाशाचा लौकिकही आता दिवसेंदिवस वाढत होता. त्यांच्या संपर्कात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातली मोठ-मोठी मंडळी येत होती. अशा रीतीने नारायणगावच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या रसिकांच्या कानात विठाबाईंच्या पायातल्या चाळाचे बोल, गळ्यातले लावणीचे सूर निनादू लागले.

विठाबाईंची आर्थिक बाजूही भरभक्कम झाली होती. रसिकांनी त्यांच्यावर मुक्तहस्ते उधळलेल्या पैशामुळे नावलौकिकाबरोबरच चांगला पैसाही त्या गाठीला बांधत होत्या. पण जवळच्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला.

पण विठाबाईंनी पुन्हा मुंबईचे जुने ठेकेदार प्रभाकर कामेरकर यांच्या मदतीनं नव्यानं फड सुरू केला. नव्यानं माणसं बांधली. या वेळी त्यांची मुलगी मालतीही त्यांच्या मदतीला होती. पण विठाबाई आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांनी खचल्या होत्या. अधून-मधून त्यांना गोत्यात आणणार्‍या नातेवाईकांच्या  कारवाया, थोरली मुलगी मंगला बनसोडे हिचं विभक्त होणं, खुद्द विठाबाईंच्या तमाशाच्या बसला झालेला अपघात या सर्व घटनांनी त्यांचं मनोधैर्य खचत होतंच पण त्या कर्जातही आणखी रुतत होत्या.  

तसं त्यांच्या कलेनंही त्यांना भरभरून दिलं. त्यांनी केलेली रसिकसेवा आणि कलेची सेवा सर्वपरिचित होती. त्यामुळे त्यांच्या पडत्या काळातही केवळ त्यांच नाव ऐकून त्यांना मदत करणारे अनेक जण होते. यात महत्त्वपूर्ण उल्लेख करावा लागेल तो लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी, वृत्तनिवेदक प्रदीप भिडे आणि तमाशाचे अभ्यासक प्रकाश खांडगे यांचा. या तिघांनी वृत्तपत्रातून, दूरदर्शनवरून विठाबाईंची परिस्थिती लोकांसमोर मांडली आणि त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला. दुर्गाबाई भागवतांनी १०,००० रु. ची मदत केली. यातूनच या तमाशा सम्राज्ञीचा सत्कार करण्याची कल्पना पुढे आली. आणिमुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या सभागृहात विठाबाईंचा हा सत्कार सोहळा दुर्गाबाई भागवतांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमामुळे विठाबाईंचे कलेवरील प्रेम आणि निष्ठा पुन्हा एकदा रसिकांपुढे आली.

विठाबाईंनी या पैशातून आपली जुनी देणी चुकती केली, गहाण पडलेल्या गाड्या सोडविल्या. इथून पुढे स्वत:च्या जिवावर फड चालवण्याची उमेद त्यांच्यात आता राहिली नव्हती. म्हणून आपला फड तिनं मुलीच्या फडात विलीन केला आणि स्वत: आपल्या वतनाच्या गावी म्हणजे नारायणगावला निघून गेल्या. पण माध्यमांच्या प्रसिद्धीमुळे त्यांचे नाव आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आदराने घेतले जात होते. त्यामुळे तमाशातून पूर्ण अंग काढून घेऊनही त्यांचे सत्कार समारंभ चालूच होते. याच काळात संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी विठाबाईंच्या तमाशाची दुसर्‍यांदा निवड झाली. त्यांना आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. विठाबाईंना त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पुरस्कार मिळत होते.

 

विठाबाईंच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना त्यांचं कलेवरचं प्रेम, निष्ठा, त्यासाठी केलेवरचं प्रेम, निष्ठा, त्यासाठी केलाला त्याग, निभावून नेलेले प्रसंग पाहिले की, आवाक व्हायला होतं. त्याच वेळी तमाशा फडांवरील काही अपरिहार्यतांमुळे झालेली आयुष्याची दैना हा सुद्धा त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता. पण विठाबाईंची कहाणी अनुभवताना लक्षात राहतं ते त्यांचंतमाशाच्या क्षेत्रातलं अलौकिक कर्तृत्व! गावकुसाबाहेरच्या या कलेला त्यांनी लोककलेचा दर्जा दिला. विठाबाई हे एक अजब रसायन होतं. त्यांची कला, निष्ठा, त्यांचं आयुष्य, त्यांचं दु:ख, त्यांचा बहराचा काळ, या काळात भोगलेलं ऐश्वर्य, झालेली दुर्दैवी फसवणूक हे सगळंच विलक्षण होतं. समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीनुसार तमाशाच्या फडावर, त्यातील कलावंतीणींवर पुरुषांचेच वर्चस्व असते. `स्त्री' आपली कला सादर करते, पुरुषांकडून पैसा उधळला जातो, परत त्या पैशावर पुन्हा पुरुषच डल्ला मारतात. याही परिस्थितीत तमाशा फडाशी जोडलेल्या सर्व अपरिहार्यतांचा स्वीकार करून विठाबाईंनी कला जपली, लोकांना आनंद दिला. ही गोष्ट विठाबाईंची महानता अधोरेखित करते.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे